पुणतांबा – गेली पाच वर्षे कोपरगाव मतदारसंघातील प्रश्नांसाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघाचा विकास केला. विकासनिधी मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करून संघर्ष केला. त्यांच्या कामामुळे त्यांनी मतदारसंघात विकासाची बुलेट ट्रेन निर्माण केली, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा येथे झालेल्या जाहीर सभेत ना. मुनगंटीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे रवींद्र बोरावके, सचिन तांबे, तालुकाध्यक्ष शरद नाना थोरात, नंदकुमार जेजुरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजीराव ठाकरे, पुणतांबाचे धनंजय जाधव, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी, सर्जेराव जाधव, रिपाईचे दीपक गायकवाड, किरण खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, आमदार कोल्हे यांनी पाच वर्षाच्या काळात महिला आमदार म्हणून विधानभवनामध्ये नावलौकिक मिळवला. ज्यांनी देशात साठ वर्ष सत्ता भोगली. त्यांनी विकास न करता देशाला मागे नेले, जनतेला फसवले, सत्तेच्या काळात जनतेचा भ्रमनिरास केला ते आज आम्हाला पाच वर्षाचा हिशोब मागत आहे.
तुमच्या पंधरा वर्षाचा हिशोब आणि आमचा पाच वर्षाची विकास कामांची तुलना करा, तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेला फसवण्याचा एक कलमी कार्यक्रम केला. त्याला लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकविला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व व महायुतीचे सर्व नेत्यांनी सर्वसामान्य जनतेची मूलभूत तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सोडवणूक करून विकासाचा परिपाठ पूर्ण केला. या निवडणुकीत देखील जनता जनार्दन कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे घरी बसून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत.
ना. मुनगंटीवार म्हणाले, आ. कोल्हेंनी मतदारसंघात केलेल्या कामांचा आलेख उंच आहे. अर्थमंत्री असल्याने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. ती चावी आता मी आ. कोल्हेंना देणार असल्याने मतदारसंघात विकासकामे करण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ. कोल्हे यांनी पाच वर्षाच्या काळात मतदारसंघातील केलेला विकास कामाचा आढावा घेतला. मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत समस्या सोडवल्या. पाच वर्षाच्या काळात मतदारसंघाचा कायापालट विकासाचा अनुशेष भरून काढला. पुणतांबा येथील पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावून गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न सोडविला. अपप्रचार करून जनतेला दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. तो मतदारांनी मतपेटीद्वारे दाखवून विकास कामात आडकाठी येणारांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास आ. कोल्हे यांनी व्यक्त केली.