मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा शिवसेनेने राज्यात लागू करावा, सरकार पडेल याची भीती बाळगू नये. गरज पडल्यास आम्ही राजकीय तडजोड करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला साद घातली आहे.
आशिष शेलार म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाच्या आणि राज्याच्या हिताचा आहे. या कायद्याच्या मदतीने राज्यातल्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलता येईल. हे घुसखोर राज्याचे हित साधू शकत नाहीत. निर्वासित हिंदू, पारशी, ख्रिस्ती, शिख, जैन लोकांना नागरिकत्व मिळावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. शिवसेनेनेही त्यास हातभार लावावा.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू करण्यास शिवसेनेला कॉंग्रेसने विरोध केला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जुमानू नये. सरकार पडेल या भीतीपोटी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करु नये. शिवसेना देशहिताच्या भूमिकेत असायला हवी.
शेलार म्हणाले की, देशहिताच्या दृष्टीने शिवसेनेने निर्णय घेतले, तर आम्ही त्यांच्यासाठी राजकीय तडजोडीची भूमिका घेऊ. शिवसेना कोणासमोरही झुकणारा पक्ष नाही. शिवसेनेने त्यांचा बाणा जपावा.दरम्यान, शेलार यांनी कॉंग्रेसच्या भारत बचाव आंदोलनावरही टीका केली आहे. कॉंग्रेसचे आंदोलन हे “भारत बचाव’ आंदोलन नसून बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर बचाव असे आहे, असा टोला त्यांनी लागविला.