देवसंस्थाने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश : प्रसादरुपी कंपोस्ट खत शेतकऱ्यांना देणार
आळंदी- माउलींच्या समाधीवरी भाविकांकडून अर्पण करण्यात येणारे फुल, हार निर्माल्य टाकायचे तरी कुठे हा मोठा प्रश्न होता. त्यावर तोडगा काढीत माउलींच्या आशीर्वादाने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रोजच्या रोजच्या निर्माल्यापासून खत बनवण्यास देवसंस्थानने प्रारंभ करून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला, अशी माहिती राजेंद अनारसे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आळंदी-पंढरपूर वारी मार्गावर पानांच्या पत्रावळीपासून खतनिर्मिती थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षत कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन करीत आहे. यांच्यासह श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या संयुक्त विद्यमाने माऊली मंदिरातील निर्माल्यापासून खत बणवण्यास आज प्रारंभ करण्यात आला. माहिती राजेंद्र अनारसे यांनी दिली. निर्माल्यापासून खत प्रकल्पातील शेल्टर मशिनचे विधीवत पूजन फाउंडेशनच्या वतीने नितीन भाटलेकर यांचे हस्ते व ज्येष्ठ संत साहित्यिक तथा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे 13 वे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, कमिन्सच्या अवंतिका कदम, संदिप क्षीरसागर, अनिल कुलकर्णी, निर्माल्य प्रोजेक्ट प्रमुख संपत खैरे, दीपक चांदगुडे, किरण गेहेरवार, प्रशांत चितळे आदी उपस्थित होते.
आळंदीत संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणीअर्पित निर्माल्य व भोजनप्रसादासाठी वापरले जाणाऱ्या पानांची पत्रावळ्या व द्रोण यांपासून देशी गायीचे गोमय व गोमुत्राचा वापर करून उत्कृष्ट प्रकारचे कंपोस्ट खत प्रसाद स्वरूपात शेतकऱ्यांना देऊन आगामी काळात हा प्रकल्प आळंदीतील ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने विशेष उंचीवर नेण्याचा मनोदय ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, डी. डी. भोसले पाटील, डॉ. सारंग जोशी, बाळासाहेब पवार, हभप शिवाजी महाराज नवल, बबनराव कुऱ्हाडे, विलास धुंडरे, स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल तापकिर, शारदा दिघे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व त्यांचे सर्व सहकारी व हभप सुभाष रणपिसे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत अवचट यांनी करुन आभार मानले.