महाआघाडीच्या विविध वक्त्यांचा विश्वास : कवठे, वडनेर येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ सभा
वडनेर – शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा करुन विकासासाठी योगदान दिले आहे. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा 39 गावांच्या उसाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तसेच यंदा मतदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसदेत पाठविल्या शिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास विविध वक्त्यांनी व्यक्त केला.
कवठे, वडनेर (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा ऐतिहासिक ठरली. डॉ. कोल्हे यांचे जंगी स्वागत करताना ग्रामस्थांनी मिरवणूक काढून पाठिंबा दर्शविला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, प्रदिप वळसे-पाटील, राजेंद्र गावडे, बाबाजी निचित, रतन निचित, सुभाष निचित, सुनिता गावडे, अरुणा घोडे, दामू घोडे, मानसिंग पाचुंदकर, सरपंच शेवंता चिमाजी-निचित, उपसरपंच निवृत्ती निचित, प्रतीक निचित, दीपक रत्नपारखी, सुहास इचके, बाळासाहेब इचके, वसंत पडवळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले की, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. इतकेच नाही तर 39 गावांच्या उसाचा प्रश्न नवीन कारखान्याच्या माध्यमातून सोडविण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी नियोजन केले असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. येथील खासदारांनी काय विकास केला, कुठे लक्ष दिले? याचा आता विचार करुन डॉ. कोल्हे यांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून संसदेत पाठवायचे आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी दिलीप वळसे पाटील व पोपटराव गावडे यांची भाषणे झाली.
- पंधरा वर्षे खासदार असूनही विकासाचे तीन-तेरा अशी परिस्थिती शिरुर लोकसभा मतदार संघाची झाली आहे. खासदारांनी काय काम केले? हा संशोधनाचा विषय आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार, राष्ट्रवादी व महाआघाडी