फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
मुंबई : शिवसेनेने जनमताचा अनादर करुन अपेक्षा भंग केला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत शुक्रवारी केली होती. आता आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. तसेच आता चर्चेची वेळ निघून गेली आहे, त्यामुळे आता कुणीही दारं उघडी ठेवू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस विरोध पक्षनेते म्हणून बोलत आहेत. त्यांच्याकडून राज्याला वेगळ्या अपेक्षा आहेत. त्यांचा डीएनए आणि आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे आमचं चांगलाच जमेन, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेसाठी भाजपची दारं उघडी आहेत, असे फडणवीस मुलाखतीत म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी म्हटले की, आता दरवाजे उघडी ठेवली आहेत. मात्र जेव्हा दारं उघडायची होती, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या स्वीकारायला तयार नव्हते. हे चित्र कसं निर्माण झाले याचा विचार त्यांनी केला पाहिजे.
राज्याला चांगल्या विरोधी पक्षाची परंपरा आहे. ही परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी पुढे न्यावी. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न झाले. मात्र आम्हाला आता त्यामध्ये पडायचे नाही. तो कालखंड संपला आहे. त्यामुळे कुणीहा आता कुणासाठी दरवाजे खुले ठेवू नयेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.