बळीराजा चिंतातूर : कैऱ्या गळून पडल्या
सततच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हवालदिल
आंदर मावळ- मावळ तालुक्याच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळात असला तरी शेतातील काढणी केलेला पिकासह आंबा, शेवगा या पिकाला फटका बसत आहे. आंबा पिकाला अवकाळी तडाखा बसल्यामुळे शेतकरी राजा चिंतातूर झाला आहे.
मावळात “एप्रिल हीट’मुळे नागरिक हैराण झाले आहेत.
दुपारनंतर वातावरणात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, तर सायंकाळी आकाशात ढग दाटून येतात व सोसाट्याचा वाऱ्यासह विजेचा कडकडाटसह पाऊस कोसळतो. त्यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकही पुरते हैराण झाले आहेत. खराब हवामानाचा फटका सध्या शेतात असलेल्या आंबा पिकाला बसत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
हातातोंडाशी आंबा हिरावला
सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने झाडांना कैऱ्या लगडल्या आहेत. तर उन्हाळी हंगामातील बाजरीचे व भुईमूग पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु या वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे कैऱ्यांनी गळून पडल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला आंबा पीक आस्मानी संकटाचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.