रसदार असल्याने ज्युस विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी
पुणे – रत्नागिरी भागातून येणाऱ्या अमृत पायरीची बाजारात चलती आहे. रत्नागिरी हापूसच्या तुलनेत अधिक रसदार, मधुर असलेल्या या आंब्याची ज्युस विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि केटरींगवाल्यांकडून खरेदी करण्यात येत आहे. आवक कमी असल्याने पायरीच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत पेटीमागे 500 ते 600 रुपयांनी वाढ झाली आहे.
याविषयी आडतदार करण जाधव म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील पावस, पूर्णागड, गावखडी, अडिवरे, कशेळी भागांतून पायरीची आवक होत आहे. बाजारात सोमवारी 75 ते 100 पेटींची आवक झाली. आमरसासाठी हमखास वापरल्या जाणाऱ्या पायरीला दर्जा, गोडीमुळे मोठी मागणी आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात 5, 6 आणि 7 डझनाच्या पेटीस अनुक्रमे 1 हजार 800 ते 2 हजार 500 रुपये भाव मिळत आहे.
सोमवारी येथील घाऊक बाजारात 3 ते साडेतीन हजार पेट्या रत्नागिरी हापूस विक्रीसाठी दाखल झाला. मागणी कमी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत हापूसच्या भावात 200 ते 500 रुपयांनी घट झाली आहे. येत्या आठवडाभरात कर्नाटकातून आंब्याची आवक सुरू होईल. तसेच, रत्नागिरी येथूनही आवक वाढेल. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले हापूसचे भाव आणखी खाली येतील, अशी शक्यता आंब्याचे अडतदार नाथ खैरे यांनी वर्तविली आहे.
मार्केटयार्डातील घाऊक बाजारातील आंब्याचे भाव
हापूस (कच्चा)
5-6-7 डझन 1500 ते 2500
पायरी (कच्चा)
5-6-7 डझन 1800 ते 2500