पुणे – जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक (नववी ते बारावी) शाळा सुरू झाल्या असल्या तरी सोमवारी केवळ 4 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. करोना संसर्गाच्या भीतीने अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत तयार नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
मात्र, शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला संसर्ग होणार नाही याची खबरदारी जिल्हा परिषद घेत आहे. त्यातही एखाद्याला झाल्यास त्याच्या उपचाराची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार आहे.
अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शिक्षण समितीचे सभापती व उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे उपस्थित होते.
रणजीत शिवतरे म्हणाले, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांच्या खोल्या व परिसर निर्जंतुकीकरण करून घेतले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बसवण्यात येत आहे. शाळेमध्ये विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात राहू नये यासाठी मधली सुट्टी किंवा खेळाचे तास घेण्यात येणार नाही.