कोकणवगळता कार्यवाही
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मार्चमध्येच पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे हे जिल्हे वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आता राबविण्यात येणार आहे असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे – राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या 20 मे पर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांचा विषय हा दरवर्षीच चर्चेचा विषय ठरतो. बदल्यांवरुन बऱ्याचदा वाद उफाळून येतात. सोयीच्या गावांमधील शाळेत आपली बदली व्हावी, यासाठी शिक्षकांचे जोरदार प्रयत्न आधी पासूनच सुरू आहेत. यात काहींना यश मिळते तर काही अपयशी ठरतात. मात्र, बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने संगणक प्रणालीचा वापर करण्यावर भर दिलेला आहे.
शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत 8 मार्च 2019 रोजी शासनाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले होते. बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा यांच्या याद्या घोषित करणे व त्यांची नोंदणी संगणक प्रणालीवर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यास लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थगिती देण्यात आली होती, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
आता पुन्हा ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना.भंडारकर यांनी बदल्यांची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश नुकतेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजाविले आहेत. अवघड व सर्वसाधारण क्षेत्रांच्या याद्या घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय गावांची यादी घोषित करणे, समानिकरणासाठी रिक्त ठेवावयाची अनिवार्य जागांची यादी घोषित करणे, शाळानिहाय जागा घोषित करणे आदी प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करावी लागणार आहे.