जामखेड: शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींची शाळा येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या वादळाने सहा वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळांना सुट्टी आसल्याने मोठा अनर्थ टळला. या शाळेत एकुण 800 मुले व मुली शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे हाच प्रश्न शिक्षकांना पडला आहे. गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या मुलामुलींच्या शिक्षणाची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या चे पञे उडाले असून आता या शाळेची दयनीय अवस्था झाली असून आता गरीबाच्या मुला मुलींनी आता कुठे शिक्षण घ्यायचे असा प्रश्न पालकांना व शिक्षकांना पडला आहे.
या वादळात काही पत्रे शाळेतील झाडांवर जाऊन पडल्याने झाडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शाळेतील पुस्तके, तक्ते, एलएडी, टी व्ही, फॅन सह शालेय साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवीदादा सुरवसे, सभापती सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, गटविकास अधिकारी रुपचंद जगताप, बांधकाम उपअभियंता पानसरे, केंद्रप्रमुख निळकंठ घायतडक, शाळेच्या मुख्याध्यापिका मिराताई खेडकर, शैलजा बडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली असता या सर्व वर्ग खोल्यांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी कामगार तलाठी कांराडे यांना दिले.
यावेळी नितीन मोहळकर, प्रताप पवार, नितीन शिंदे, शाळेचे अध्यक्ष विजय सोनार, उपअध्यक्ष नितीन टेकाळे, माजी उपसभापती विलासराव मोरे, खांडवीचे सरपंच डॉ गणेश जगताप, आरणगावचे सरपंच लहु शिंदे, भरत जगदाळे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत ही माजी मुख्याध्यापक व आमदार दशरथ निकाळजे गुरुजी यांच्या काळात सन 1958 साली या इमारतीचे बांधकाम झाले आहे. अतिशय जुन्या पध्दतीने बांधकाम केलेले असून ते आज संपूर्ण जिर्ण झाले असून सर्व इमारत धोकादायक बनली आहे.