खन्ना (पंजाब) – 1984 साली झालेल्या शिखविरोधी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावरून कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचे विदेश विभाग प्रमुख सॅम पित्रोदा यांची पुन्हा एकदा खरडपट्टी काढली आहे. या दंगलीसंदर्भात पूर्णपणे चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या वक्तव्यासाठी तुम्ही देशाची माफी मागितली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
निवडणूकीच्या प्रचारासाठी पंजाबमधील पहिल्याच सभेदरम्यान राहुल गांधी यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पित्रोदा यांच्या “हुआ तो हुआ’ या वक्तव्यानंतर उभ्या राहिलेल्या वादंगाच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांच्याकडून ही सावरासावर केली गेली. राहुल गांधी यांनी यापूर्वीही पित्रोदा यांच्या वक्तव्याबाबत ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. पित्रोदा यांचे मत हे कॉंग्रेस पक्षाचे मत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
“पित्रोदा यांचे वक्तव्य चुकीचे होते. त्यांनी याबाबत देशाची माफी मागायला पाहिजे. याबाबत त्यांच्याशीही समक्ष बोलणे झाले आहे. या वक्तव्याबाबत आपण त्यांना सुनावले आहे.’ असे राहुल गांधी म्हणाले. हरियाणातील रोहतक आणि पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातल्या शुक्रवारच्या सभेदरम्यान पंतप्रधान मोदींनीही पित्रोदांचे वक्तव्य कॉंग्रेसचा स्वभाव आणि अहंकार दर्शवत असल्याची टीका केली होती.
पंजाबमधील सभेदरम्यान राहुल गांधी यांनी “जीएसटी’चा उल्लेख नेहमीप्रमाणे “गब्बर सिंग टॅक्स’ असा केला, “जीएसटी’ आणि नोटबंदी हे भाजप सरकारच्या सर्वात भीषण गोष्टी आहेत. या दोन्हींच्या निर्णयामुळे देशातील जनतेची खरेदीची क्षमता आणि रोजगार दोन्हीवर विपरीत परिणाम झाल्याचे ते म्हणाले. राफेल व्यवहारावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. 2 कोटी युवकांना रोजगार, शेतमालाला हमी भाव आणि प्रत्येक नागरिकाच्य खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याबाबत 2014 मध्ये केलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारला करता आली नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर मोदींना खुल्या चर्चेचे आव्हानही त्यांनी दिले.