नवी दिल्ली – दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी आघाडी करण्याच्या विषयावरून आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस पक्षांमध्ये सुरू झालेला चर्चेचा घोळ अजून संपलेला नाही. दोन्ही पक्षांनी आता आम्ही आघाडी करणार नाही अशी घोषणा करूनही हा विषय जीवंत राहिला आहे कारण हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर त्यांचा एकही उमेदवार येथे निवडून येणार नाही असे सर्वच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे आघाडी न करण्याच निर्णय घेतल्यानंतरही पुन्हा आघाडीचा प्रस्ताव दोन्ही पक्षांकडून सातत्याने एकमेकांना दिला जात आहे.
आज पुन्हा या विषयाला आम आदमी पक्षाने तोंड फोडले. आम्ही केवळ दिल्ली पुरती आघाडी करणार नाही तर कॉंग्रेसने आमच्याशी हरियानातही आघाडी केली तर आम्ही त्यांच्याशी दिल्लीत आघाडी करण्यास अजूनही राजी आहोत असे त्यांनी म्हटले आहे. या संबंधात संजयसिंह म्हणाले की हरियानात 6:3:1 या फॉर्म्युल्याला कॉंग्रेस तयार होती.
कॉंग्रेस सहा जागांवर जननायक जनता पार्टी तीन जागांवर आणि आम आदमी पक्ष एका जागेवर निवडणूक लढवण्यास त्यांनी मान्यता दिली होती पण आता त्यांनी जननायक जनता पार्टीला तीन ऐवजी केवळ दोनच जागा देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे हरियानातील आघाडी अडली आहे असे आम आदमी पक्षाचे संजयसिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की जो पर्यंत हरियानाच्या बाबतीत निर्णय होत नाहीं तो पर्यंत आम्ही दिल्लीच्या आघाडीला राजी होणार नाही.