नवी दिल्ली – उत्तरप्रदेश पोलिसांनी काहीं पत्रकारांना केलेल्या अटकेचा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची ही कृती मुर्खपणाची असल्याची टीकाहीं त्यांनी त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर केली आहे. जर खोटी माहिती छापणे, किंवा खोट्या बातम्या प्रसारीत करण्याच्या कारणाने पत्रकारांना अटक करण्यात आली तर माझ्याच बाबत असंख्य पत्रकारांना तुरूंगात टाकावे लागले असते आणि प्रसार माध्यमांना कर्मचाऱ्यांचाच तुटवडा भासला असता अशी उपरोधिक टिपण्णीही राहुल गांधी यांनी केली आहे.
उत्तरप्रदेश सरकारने अटक केलेल्या सर्व पत्रकारांची तातडीने सुटका करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची बदनामी केल्याच्या कारणाने मुक्त पत्रकार कनोजिया, अंजु शुक्ला, इशीका सिंग यांच्यावरही उत्तरप्रदेश सरकारने कारवाई केली आहे. कनोजीया, शुक्ला, आणि सिंग यांच्यावरील कारवाईचा एडिटर गिल्ड या संपादकांच्या संघटनेने या आधीच तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणात पत्रकारांच्या संघटनेने सोमवारी दिल्लीत निदर्शनेही आयोजित केली होती.