“मी हल्ली योगा चालू केलं आहे’ किंवा “आज वेळ होता म्हणून सकाळी सकाळी योगा करून टाकला’ अशी वाक्यं कधीकधी कानावर पडतात आणि मला गंमत वाटते. आपली अवस्था योगाच्या बाबतीत “अतिपरिचयात अवज्ञा’ अशी झाली आहे. मुळात “योगा’ हा उच्चारच चुकीचा आहे. युज् या मूळ संस्कृत शब्दापासून “योग’ हा शब्द तयार झाला आहे. युज् म्हणजे जुळणी, जोडणी. गोष्टी जुळून आल्या की आपण “योग आला’ म्हणतो.
आता योगशास्त्रात कोणत्या दोन गोष्टी एकत्र यायला हव्यात? शरीर आणि मन! हे म्हणायला सोपे आहे. पण तुम्ही तपासून पहा. आपण शरीराने जिथे असतो तिथे मनाने किती वेळा असतो? तेव्हा योग साधायचा असेल तर आधी ही कला शिकून घेतली पाहिजे. योगशास्त्र हा ग्रंथ पातंजली मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सूत्रांच्या स्वरूपात लिहिला. त्यात त्यांनी अष्टांगयोग सांगितला आहे.
पतंजली मुनींनी योगाच्या एकूण आठ पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली “यम’. यात वैयक्तिक स्वच्छता, शांतता यांना महत्त्व आहे. दुसरी पायरी म्हणजे “नियम’. यात पाच गोष्टींचा समावेश होतो. (1) अहिंसा – कृतीमधे तर हिंसा नकोच पण बोलण्यानेही कुणाला दुखावू नका. मनातही हिंसेचे विचार आणू नका. (2) सत्य – कोणत्याच व्यवहारात खोटेपणा नको. सत्य हेच आपले तत्त्व असले पाहिजे. (3) अस्तेय – चोरी नको. कसलीच. पैशाची, जागेची… जे आपले नाही, ते हिसकावून घेऊ नका. (4) ब्रम्हचर्य – संयम ठेवा. खाण्यापिण्यात, बोलण्यावागण्यात. वाहवत जाऊ नका. (5) असंग्रह – फार हाव धरू नका. माझं माझं म्हणून किती साठवून ठेवाल? अतिलोभ बरा नाही.
सर्वसाधारणपणे आताच्या काळानुसार यम व नियम यांचे अर्थ आपण असे लावू शकतो. यम आणि नियम हे आपण साध्य केले तर पुढचा टप्पा गाठण्याची आपली तयारी झाली आहे असे समजायला हरकत नाही. कोणता आहे तिसरा टप्पा? तिसरा टप्पा म्हणजे “आसन’. जी आपण सध्या करतो ती वेगवेगळी आसने म्हणजे अष्टांगयोगातली तिसरी पायरी आहे. ह्याचा मुख्य उपयोग शारीरिक आरोग्य राखण्यासाठी होतो. म्हणून आपण ती करू लागलो.
आता ह्या झाल्या अष्टांगयोगातल्या तीन पायऱ्या. तुम्हाला उत्सुकता असेल की, मग पुढच्या पाच पायऱ्या कोणत्या? तर त्या आहेत, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. प्राणायामामधे आपण आपल्या श्वासोच्छवासाची ओळख करून घेतो. आपण जन्मभर श्वसन करीत असतो. पण एका जागी शांत बसून कधी ह्या श्वासाकडे लक्ष दिले? प्राणायामात ते करायचे आहे. यात श्वासोच्छवासाचे नियमन करण्याचे काही प्रकार आहेत. ते नीट शिकून घेऊन आत्मसात करावे लागतात.
पुढच्या “प्रत्याहार’ या स्थितीत अंतर्मुख होणे अपेक्षित आहे. चिंतन, मनन करून आपल्या आतला आवाज ऐकायला शिकायचे आहे. पुढचा टप्पा म्हणजे “धारणा’. चिंतन मनन यातून साधलेली एकाग्रता धारण करता आली पाहिजे. शरीरमनात मुरवून घेता यायला हवी. यातून हळूहळू आपण योग साधू शकतो. म्हणजेच शरीर व मन एकरूप होण्यास सुरुवात होते. एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळाल्याचा अनुभव येतो.
सातवी पायरी आहे ती म्हणजे “ध्यान’! आपल्या मनात विचारांचा प्रवाह सतत चालू असतो. तो आपण थांबवू शकत नाही. आपल्या नकळत एकामागोमाग विचारांची साखळी चालूच राहते. ध्यान या अवस्थेमधे हे मनोव्यापार न्याहाळण्याचे काम आपण करायचे आहे. त्रयस्थपणे या विचारांकडे पाहता आले पाहिजे. या अवस्थेत आपण आत्मनिरीक्षण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि योगाची शेवटची पायरी म्हणजे “समाधी’. आत्मा आणि परमात्मा यांचे मीलन! लौकिक, व्यावहारिक गोष्टींपासून आपल्या मनाला सोडवून घ्यायचे. अधिक चिरंतन, उच्च आनंदाची अनुभूती या अवस्थेत आपण घेऊ शकतो. हे साध्य झाले म्हणजे आपण योगाचा आठवा टप्पा पार केला.हे खरेच आपल्याला साध्य होईल का? होऊ शकेलही! त्यासाठी तितकी तीव्र संवेदनशीलता हवी, सूक्ष्म रुपाने अनुभव घेण्याची क्षमता हवी. एकाग्रचित्त होता आले पाहिजे. तेवढे मनोबल हवे. ज्यांच्या बाबतीत हे सगळे जुळून येते, त्यांना असे दिव्य अनुभव येतात.
– माधुरी तळवलकर