इस्लामाबाद – काश्मीरमधील विभाजनवादी नेता आणि जेकेएलएफ संघटनेचा प्रमुख यासीन मलिक याचा पुळका पाकिस्तानला आला आहे. मलिकच्या अटकेबद्दल त्या देशाने भारतावर आगपाखड केली आहे.
दहशतवादासाठी पुरवल्या जाणाऱ्या पैशांच्या प्रकरणावरून (टेरर फंडिंग) मलिक राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) रडारवर होता. विशेष एनआयए न्यायालयाने त्याला कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी दिली. त्यानंतर एनआयएने त्याला 10 एप्रिलला अटक केली. त्याला तिहार तुरूंगात हलवण्यात आले. त्याआधी त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कोठडीत घेऊन जम्मूच्या तुरूंगात ठेवले होते. आता त्याची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. त्यावरून पाकिस्तानला काळजी वाटत आहे. मलिक अजूनही कैदेत असल्याचा त्या देशाने निषेध केला आहे. तसेच, भारताकडून त्याच्या प्रकृती काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. भारत सरकारने मागील महिन्यात जेकेएलएफवर बंदी घातली. इतर दोन प्रकरणांवरून मलिक सीबीआयच्याही रडारवर आहे. विभाजनवादी नेत्यांना पाकिस्तानची फूस असल्याचे मलिक प्रकरणावरून पुन्हा एकदा उघड झाले आहे.