– विठ्ठल वळसे पाटील
आज जागतिक चिमणी दिवस. चिमणीचा दिवस का साजरा करावा? तिचे एवढे काय महत्त्व? चिमणी नसली तर आपणाला काय फरक पडतो? असे अनेक प्रश्न अनेकांना पडू शकतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या चिमणी दिवसानिमित्त…
चिव-चिव, चिव-चिव चिमणी करते ।
सगळ्यांच्या मनाला जिंकून घेते ।।
चिव, काऊ बरोबर ससा, मांजर, कुत्रा अशा अंगणात नांदणाऱ्या पक्षी, प्राण्यांविषयी नेहमी बालपणाला भुलवणारे व आनंद देणारे जीवन सुखकर असते. त्यांच्या गोष्टी ऐकत, त्यांची बडबड गीते ऐकत आपण लहानाचे मोठे होतो; पण बालपणीचे हे सवंगडी आपण मोठेपणी विसरून जातो. त्यांची आठवण करण्यासाठी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक चिमणी दिवस 20 मार्च, 2010 पासून सुरू झाला. पूर्वी परसबाग, अंगण, दिवाणखाना, घराच्या छतावर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. तो आज कमी झाला आहे. कारण मोठ्या प्रमाणात वने नष्ट होत असून, वाढते सिमेंटचे जंगल, मोबाइल टॉवर, कमी धान्यपीक शेती, रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम झाला. यातून घटत चाललेली चिमण्यांची संख्या वाचवण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी पुढे आले. यातून चिमणी संवर्धनाचा संकल्प करताना जागतिक चिमणी दिवस उजाडला!
जगामध्ये अनेक आपत्ती आल्या, यात पर्यावरण आपत्तीबाबत अनेक निष्कर्ष काढले गेले. असाच निष्कर्ष 1958 साली धान्य उत्पादनाला घट निर्माण करणाऱ्या चिमण्यांची वाढती संख्या कारणीभूत आहे, असा निष्कर्ष काढून चीनमध्ये चिमण्या मारण्याचा आदेश दिला गेला. त्यामुळे अनेक चिमण्या व त्यांची घरटी नष्ट केली गेली. मात्र, याचा उलट परिणाम झाला. कारण पिकांवरील किटकांची संख्या वाढली. मात्र त्यांना टिपणाऱ्या चिमण्याच उरल्या नव्हत्या. परिणामी उत्पादनात घट, धान्यपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे 1960 साली अन्नधान्याचा दुष्काळ निर्माण झाला. ही चिमणी दिनाच्या दिवशी आठवण करून देणारी बाब आहे की, पक्षी हे निसर्गरक्षी असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर हवी.
सध्या जगात 101 पक्षी हे संवर्धनाची गरज असलेले आहेत. यात चिमणीचाही समावेश आहे. जगात साधारणपणे 24 तर भारतात 5 प्रकारच्या चिमणीच्या प्रजाती आढळून येतात. या सर्व चिमण्यांची जीवनशैली वेगवेगळी आहे. आयसीएन संस्थेने 2002 साली चिमणीचा सर्वप्रथम संकटग्रस्त गटात समावेश केला. 2010 साली जागतिक चिमणी दिवस समोर आला. 2012 साली दिल्लीने तर 2013 साली बिहारने चिमणीला राज्यपक्षी म्हणून घोषित केले. चिमण्यांचे खाद्य म्हणजे किडे, कृमी, कीटक असून वाढते सिमेंटचे जंगल, वाढते विदेशी वृक्ष, वाढते तापमान, ध्वनिप्रदूषण, मोबाइल टॉवर व धान्यपीक शेतीसारखा दुर्लभ झालेला विषय यामुळे चिमण्यांची संख्या घटत असून याबरोबर कावळा, बगळे, साळुंखी, सुतार पक्षी, पोपट, कोकिळा, धीवर, खंड्या, ससाणा, घार, गिधाड, घुबड तसेच मधमाशी, भुंगे नाहीसे होताना दिसत आहेत. त्यामुळे निसर्गाच्या रक्षणकर्त्यांवर घाला घातला जाणार नाही याची दक्षता घेतली जावी.
चिमणी दिवस आला की अनेकांचे पक्षीप्रेम जागे होते. मग वाटीभर पाणी व मूठभर धान्य पक्ष्यांसाठी ठेवण्याचे आवाहन केले जाते. त्याचे मग फोटो काढून निसर्गप्रेमाचे भांडवल उभे केले जाते. पक्ष्यांच्या जीवनाचे महत्त्व हे शिकलेल्या माणसांपेक्षा न शिकलेल्या माणसाला अधिक कळते. शेतकरी बांधव कधीही झाडावर पक्ष्यांचे घरटे असले तर झाड तोडणार नाही. शिवाय ज्वारी, बाजरीसारखी पिके पक्ष्यांच्या अन्नासाठी सोडून दिली जातात. हा प्रयोग म्हणून कृषीविभागाने राबवणे गरजेचे आहे. कमी उंचीचे वाढणारे तरकारी पालेभाज्याच्या पिकाकडेने ज्वारी, बाजरी, अशी धान्य देणारी पिके जास्त अंतर ठेवून लावावी जेणेकरून पक्ष्यांचे अस्तित्व राखले जाईल, शिवाय कीटक व कृमी यांचाही नायनाट होईल.
निसर्ग संवर्धनासाठी दोन पावले पुढे टाकताना जास्तीत जास्त शेतबांध, इमारतीच्या बाजूला फुले, फळे, शेंगा, देणारी देशी वृक्षांची लागवड होणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे पक्ष्यांना निवारा व अन्न मिळेल.
मार्चच्या उन्हाच्या झळ्या जाणवू लागल्या की पक्ष्यांसाठी मूठभर धान्य व वाटीभर पाणी ठेवणे हा सामाजिक उपक्रम सुरू होतो. हे करत असताना आपण पक्ष्यांना ऐतखाऊ बनवत आहोत, हेही लक्षात ठेवा! त्यांना त्यांचे अन्न निसर्गातून मिळवण्यासाठी निसर्ग समृद्ध करा. भविष्यातील अन्नटंचाई पाहिली तर पक्ष्यांना धान्य टाकणे परवडणारे नाही, त्यासाठी धान्यपीक, कडधान्य, तृण शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. जंगलातच कृत्रिम पाणवठे निर्माण केले पाहिजे. त्यामुळे पशू व पक्षी पाण्यावाचून मरणार नाहीत. तसेच डोंगर, जंगले वणव्यापासून वाचवले पाहिजे.
आपल्या अंगणात चिऊ, काऊ, पोपट, कोकीळ असे पक्षी नांदावयाचे असतील तर मुलांना त्यांच्या गोष्टी सांगण्यासोबतच त्यांच्या अस्तित्वावर मानवी जीवन किती अवलंबून आहे हेही शिकवले पाहिजे.