लोकप्रतिनिधींना डावलून परस्पर बैठका : सर्व शहरांसाठी बाह्यवळण रस्ते करणार
नगर: लोकप्रतिनिधींना डावलून परस्पर अधिकारी बैठका घेत असल्यामुळे जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली असल्याचा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी केला. विकास कामे पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती देखील आवश्यक आहे. परंतु लोकप्रतिनिधींना न बोलविताच अधिकारी बैठकांचा सोपस्कार करीत असल्याने लोकप्रतिनिधींना विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी मर्यादा पडतात. त्यामुळे विकास कामांना गती मिळत नसल्याचे खा.विखे म्हणाले.
जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर खा.डॉ.विखे पत्रकारांशी बोलत होते. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कामांचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारकडून सीआरएफचा निधी नगर जिल्ह्याला एक रुपया देखील मिळाला नाही. महाराष्टाला 2100 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून नगर जिल्ह्याला शंभर कोटी निधी मिळाला तर जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे मार्ग लागतील. परंतू आजवर सीआरएफचा निधी नगर जिल्ह्याला मिळाला नाही. याबाबत केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना नगर जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे सांगून खा.डॉ. विखे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्ह्यात नगर-दौंड, सोनई-शिंगणापुर या रस्त्यांची कामे सुरू आहेत.
जिल्ह्यात अनेक राज्यमार्ग हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. परंतु ते अद्यापही हस्तातंरित झालेले नाही. ती देखील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नगर दक्षिणेतील सर्व शहरांसाठी बाह्यवळण रस्ते करण्याचा मानस असून त्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
कर्जत, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या शहरांसाठी प्रामुख्याने बाह्यवळण रस्त्यांची आवश्यक आहे. नगर शहरातील बाह्यवळण रस्त्याचे काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे. शहरातील उड्डाणपुलाचे कामे देखील आता अंतिम टप्प्यात आहे. निविदा काढून काम करणाऱ्या ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू भूसंपादन न झाल्याने या कामाला सुरूवात झाली नाही. आतापर्यंत 86 टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. पुलाचे काम सुरू करून महिन्याभरात पुलाचे सांगाडे उभे करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, अधिकारी परस्पर बैठका घेत असल्याने लोकप्रतिनिधींना या कामांबाबत माहिती होत नाही. ते कोणत्या टप्प्यात आहे. त्यासाठी कोणाकडे पाठपुरावा करावा लागणार हे लोकप्रतिनिधींना माहित होत नाही. लोकप्रतिनिधींना डावलून या बैठका घेण्यात येतात. त्यामुळे त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळत नाही.प्रशासन परस्पर विकास कामांच्या बैठका घेवून लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवत असल्याचा आरोप यावेळी खा.डॉ. विखे यांनी केला. उड्डाणपुलाबाबत महापौरांना अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. परवा दिवशी मी बैठक घेतल्यानंतर महापौरांना अडचणी लक्षात आल्या. त्यांनी त्या एका फोनवर दूर केल्या. असे खा. डॉ. विखे म्हणाले.
यापूर्वीचे मला सांगता येणार नाही. परंतु मी खासदार झाल्यापासून मला तरी तसा अनुभव आला असून अधिकारी परस्पर लोकप्रतिनिधींना डावलून बैठका घेत आहेत. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधी किंवा सध्याच्या लोकप्रतिनिधींबद्दलचा अनुभव मला माहिती नाही, असे सांगून खा. डॉ. विखे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला लक्ष्य केले.
यापुढे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलविले नाही तर रेंगाळणाऱ्या विकास कामांना ते जबाबदार राहतील, लोकप्रतिनिधी कामांचा शासनस्तरावर पाठपुरावा करू शकतात. राजकीय इच्छाशक्तीशिवाय कामे होत नाही. परंतु अधिकारी लोकप्रतिनिधींना डावलून कामांच्या बैठका घेत असतील तर ते योग्य होणार नाही, असे खा. डॉ. विखे म्हणाले.