जयपूर (पीटीआय) – राजस्थानातील अलवर येथे एका दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील सत्ताधारी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अलवर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून निवडणूक प्रचार सभांद्वारे काँग्रेससह विरोधकांवर सडकून टीका करत आहेत. चौफेर टीका होत असल्याने अडचणीत सापडलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज राजस्थानात महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविणार असल्याची ग्वाही दिली आहे.
याबाबत बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “अलवर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटी स्पष्ट झाल्या असून आता आम्ही त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एखादी महिला जर बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली तर तिची तक्रार सन्मानपूर्वक नोंदवून घेतली जावी याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत, जर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात न आल्यास सदर तक्रार पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये नोंदवून घेतली जाईल. बलात्काराची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल.”
“पोलीस अधीक्षक (एसपी) आणि पोलीस महानिरीक्षक (आयजी) हे बलात्काराच्या गुन्हांबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देतील. या माहितीचा मुख्यमंत्री दर चार महिन्यांतून एकदा आढावा घेतील. सध्या आम्ही प्रत्येक गुन्हा नोंदवून घेण्याची ताकीद पोलिसांना दिली असल्याने नोंदविण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचा आकडा वाढू शकतो व सध्या निवडणुका सुरु असल्याने भाजपतर्फे राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे सांगण्यात येऊ शकते.” असा दावा देखील मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला.