आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
रहिमतपूर – तारगाव (ता. कोरेगाव) येथील स्टेशन परिसरातील वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्युची साथ पसरली आहे. आत्तापर्यंत पंधरापेक्षा जास्त रुग्ण विविध खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तारगाव स्टेशन परिसरात गोसावी समाजाची खूप मोठी वस्ती आहे. या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात पडलेल्या पावसाचे पाणी साठून राहिले आहे. या वस्तीच्या बाजूने जाणाऱ्या कॅनॉलवर काहीजणांनी अतिक्रमण करून कॅनॉल मुजवला आहे. त्यामुळे वस्तीतील गटाराचे पाणी व पावसाचे पाणी साठले आहे. या साठलेल्या पाण्यामुळे डेंग्युची साथ पसरली आहे. अनेक जणांना डेंग्यूची लागण होऊन खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर काहीजण दवाखान्यात उपचार घेत आहेत.
तारगाव ग्रामपंचायतीने परिसरात पाहणी करून डेंग्युचे डास मारण्यासाठी धूर फवारणी आहे. तरीही साथ आटोक्यात येत नाही. वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र येथे आहे. परंतु, गेल्या कित्येक महिन्यात या ठिकाणी आरोग्यसेविका उपलब्ध नाही. तर डेंग्यूची लागण झाल्याची माहिती वाठार प्राथमिक आरोग्य केंद्रात कळवून एकही वैद्यकिय अधिकारी भेट देण्यासाठी आलेला नाही. आरोग्य विभागाकडून काहीच उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस डेंग्यूची साथ जास्त प्रमाणात पसरत चालली आहे. स्टेशन परिसरातच हायस्कूल व एक प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे शालेय मुलांनासुद्धा डेंग्युची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या वस्तीमधील अतिक्रमणे काढून सांडपाणी वाहून जाण्याची सोय करावी. तसेच सरकारी दवाखान्यामधून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.