सणबूर – निसर्ग संपदेबरोबर वन्यप्राण्यांच्या जंगलातील अधिवास कायम टिकावा, यासाठी पाटण तालुक्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या निवी येथील गावकऱ्यांनी वन्यप्राण्यांसाठी जंगलालगतच्या ओढ्यावर श्रमदानाने बांधलेल्या बंधाऱ्यासह ठिकठिकाणी असलेल्या पाणवठ्यांची श्रमदानाने साफसफाई केल्यामुळे पाण्याच्या ठिकाणी वन्यप्राण्यांची वर्दळ वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे.
दरम्यान, निवी गावकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जवळच असलेल्या घोटील येथील ग्रामस्थांनीही वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील आणखी दोन पाणवठ्यांची सफाई करीत पाण्याचा बुजलेला प्रवाह मोकळा केल्याने वन्यप्राण्यांची पाण्याची तहान भागणार आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्यानंतर वन्यप्राणी जवळच्या गावांत शिरकाव करत असल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढून अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी वनविभाग प्रयत्नशील असतो.