कपड्यासह इतर दुकाने जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान
वाई – वाई शहरातील किसनवीर चौकात अतिशय जुन्या मोडकळीस आलेल्या कासार माडी या इमारतीला बुधवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग लागून संपूर्ण इमारत जळून खाक झाली. ही आग शॉटसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या इमारतीत लाईट सप्लाय पूर्णपणे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही भीषण आग शॉटसर्किटने लागलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसात शॉटसर्किटने लागलेल्या आगी संशयाच्या भोवऱ्यात आल्याची चर्चा वाई शहरात सध्या जोरदार चालू आहे. या इमारतीत वास्तव्यास कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. परंतु या इमारतीत असलेल्या खाऊच्या पानाच्या दुकानाचे सत्तर हजारांचे, फोटो स्टुडिओचे दोन लाखांचे तर कपड्याच्या दुकानांचे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. काही वर्षात वाई शहरात अनेक नामांकित इमारतींना व सुस्थितीत असणाऱ्या दुकानांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
शॉटसर्किटने आग लागण्याचा फंडाच वाई शहरात सुरु असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. प्रत्येक वेळी शॉटसर्किटचे कारण देत मुख्य कारणाला बगल देत असल्याचे प्रामुख्याने समोर आले आहे. तसेच वाई शहरात लागलेल्या सर्वच आगी या रात्रीच्या वेळेसच कशा लागतात, हाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. शहरात लागणाऱ्या बहुतांश आगी या मालक व भाडेकरू यांच्या वादातूनच लागतात की काय अशी शंका उपस्थित होत आहे. किसनवीर चौकात असलेली जुनाट व मोडकळीस आलेल्या इमारतीत लागलेली आग ही अशातूनच लागली असावी, अशी चर्चा दबक्या आवाजात शहरात चालू आहे.
संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या इमारतीला पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. ही इमारत शहराच्या मध्यभागी भागात असल्याने चारही बाजूनी नव्या इमारती असल्याने आग आटोक्यात आणताना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. स्थानिक नागरिक, सर्व नगरसेवक, स्थानिक नागरिक यांनी पुढाकार घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग आटोक्यात आणण्यासाठी वाई नगरपालिकेचा फायर फायटर, किसनवीर सहकारी साखर कारखाना, पाचगणी नगरपालिकेचे अग्निशामन बंबांनी तीन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. कासारमाडी ही इमारत अतिशय जुनी असल्याने पाणी मारत असताना साईडच्या भिंती कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.