पालिगंज (बिहार) – आक्रमक धोरण स्वीकारून कारवाई केली तरच देशातील दहशतवादाला काबुत आणणे शक्य होते. हीच भूमिका आमच्या सरकारने घेतली होती. त्याच अनुषंगाने आम्ही राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकीचा मुद्दा केला होता. पण त्यालाही विरोध झाला. राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही काय असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज येथील निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
ते म्हणाले की महामिलावटी लोकांना राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा व्हावा असे वाटत नाही. दहशतवादामुळे असंख्य निरपराध नागरीक मृत्युमुखी पडत असताना राष्ट्रीय सुरक्षेला महत्वाच द्यायचे नाही ही भूमिका पटण्यासारखी नाही असेही त्यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याखेरीज ते काबुत येऊ शकत नाहीत. त्यांना ते जिथे लपले असतील तेथे घुसूनच मारले पाहिजे.
या वेळी मोदींनी उपस्थितांना भावनिक साद घालताना नमूद केले की या निवडणुकीतील ही माझी बिहार मधील शेवटची सभा आहे. पुढील सरकार स्थापन केल्यानंतर मी येथे पुन्हा येईन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारी लोकांच्या पाठिंब्यामुळे मला विजयाचा विश्वास निर्माण झाला आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला.