मुंबई – सध्या देशात लोकप्रिय असलेली ऑनलाईन गेम म्हणजे पबजी. या गेमवर बंदी घालण्यात यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. मुळात पालक आपल्या मुलांना इतक्या लहान वयात मोबाईल देतातच कशाला? त्यामुळे मुले अशा प्रकारचे गेम खेळण्यास उद्युक्त होतात, असे न्यायालयाने म्हंटले आहे.
आम्ही सुद्धा पालक आहोत हे सांगत न्यायालयाने आपली मुले काय करतात, त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करू नये याची संपूर्ण जबाबदारी ही पालकांचीच असते, असे मत न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने देखील याचिकाकर्त्यांवर प्रश्न उपस्थित करत आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवणे ही सर्वस्वी पालकांची जबाबदारी असल्याचं मत मांडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच याबाबत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.