नवी दिल्ली- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे पण अजून कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेतेपदाविषयीचा निर्णय झालेला नाही. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वता राहुल गांधी हे लोकसभेतील पक्षाचे नेतेपद स्वीकारतील असे सांगितले जात होत. पण पक्षाध्यक्षपद त्यांच्याकडेच राहील असे पक्षाकडून सांगण्यात येत असल्याने आता दुसऱ्याच नेत्याची या पदावर नियुक्ती करावी लागणार आहे.
या पदाचे काम या आधी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे होते पण ते पराभूत झाल्याने पक्षाला नवीन नेता शोधावा लागणार आहे. पश्चिम बंगालचे अधिररंजन चौधरी आणि केरळचे के सुरेश हे आज मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी कॉंग्रेस तर्फे उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यापैकीच एकाला हे पद दिले जाईल असे सांगितले जात असले तरी केरळातलेच शशी थरूर आणि कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांचीही नावे या पदासाठी घेतली जात आहेत. थरूर हे लागोपाठ तीनदा या थिरूवनंतपुरम मधून लोकसभेवर निवडून आले आहेत.