महापालिका आणि पाटबंधारे विभागाचे परस्परांकडे बोट तक्रारी होताच केवळ नोटीस पाठविण्याचे सोपस्कार
पुणे – शहराचे वैभव असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात राडारोड्याचे ढिग टाकून नदीपात्र गिळंकृत करण्याचा घाट शहरभर सुरू आहे. मात्र, त्यावर कारवाई कोणत्या विभागाने करायची? याबाबत एक वाक्यता नसल्याने मोठ्या प्रमाणात नदीपात्रात अतिक्रमित होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. संगमवाडी, खराडी, तसेच म्हात्रेपुलाच्या आसपासच्या भागात ही अतिक्रमणे होत आहेत.
शहरातील मोकळ्या जागा संपल्या असल्याने अनेक व्यावसायिकांकडून नदीपात्रात राडारोड्याचे भराव टाकून जागा गिळंकृत केल्या जात आहेत. तर, संगमवाडी येथे नदीपात्रात भराव टाकून जागा गिळंकृत करण्यात येत असल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनीच समोर आणला होता. त्यानंतर पालिकेकडून संबधितांना केवळ नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर मुंढवा-केशवनगर तसेच खराडी भागातही असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. मात्र, महापालिकेने हा भराव खासगी जागेत टाकत असल्याचे सांगत, नदीला अडथळे होणार असतील, तर ही जबाबदारी पाटबंधारे विभागाचे असल्याचे सांगत या प्रकरणी केवळ नोटीस बजाविण्याची जुजबी कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा संगमवाडी येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नदीत भराव बांधण्यात आल्याचे समोर आले आहे.
ही बाब समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाच्या सर्वच संबंधित विभागांनी हात वर केले आहे. बांधकाम विभागाने “ही बाब अतिक्रमण विभागाची’ असल्याचे सांगत हात झटकले, तर अतिक्रमण विभागाकडून “ही बाब घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित’ असल्याचे स्पष्ट केले. तर या पूर्वी न्यायालयाच्या सुनावणीत पाटबंधारे विभागाने कारवाई करावी असे सांगण्यात आल्याचे सांगत ही जबाबदारी पाटबंधारे विभागाची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एका बाजूला नदीपात्र अरूंद झाल्यास पावसाळ्यात शहरात पूरजन्य स्थिती उद्भवण्याची शक्यता असतानाच, कोणताही विभाग नदीतील अतिक्रमणांची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने नदीची जबाबदारी तरी नक्की कोणाची? असा सवाल या निमित्तने उपस्थित झाला आहे.