कोपर्डेहवेली – एकीकडे शासनाच्या वतीने प्रतिवर्षी कोट्यवधी झाडांचे रोपण केले जात आहे. राज्यभर हे अभियान जोर धरत आहे. वन विभागाच्या वतीने सर्वांच्या मदतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांकडून वनविभागाच्या प्रयत्नांना खोडा घालण्याचे काम इमाने इतबारे केले जात असल्याचे मसूर परिसरातील काही भागात दिसून आले आहे.
वन विभागाच्या वतीने मसूरपासून खराडे व तारगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले आहे. उत्तम नियोजनामुळे झाडे चांगली वाढली आहेत. झाडांभोवती व रस्त्यालगत झुडपे वाढली आहेत. येता-जाता कोणीतरी विकृतपणामुळे ही झुडपे पेटवली. परिणामी झाडांना झळ बसून ती पूर्ण वाळलेली आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या श्रमालाही झळ बसली आहे. तर काही दिवसांपूर्वी सह्याद्री साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आलेले वृक्षारोपण समाज कंटकांनी आगीच्या भक्षस्थानी दिले.
शिरवडे रेल्वे स्टेशन, नडशी, वडोली निळेश्वर परिसरात अशी बरीच झाडे दिसून येत आहेत. झाडांचा बळी देण्यासाठी त्या झाडाची साल काढण्यात येत आहे. साल काढल्यामुळे खोडावर कीटक हल्ला करतात व काही दिवसांत झाडाचा अंत होत असतो. झाडाचा बळी देण्यासाठी बुंध्याशी ऍसिड ओतणे किंवा पेटता दिवा लावणे असे प्रकारही केले जात आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, वडोली निळेश्वर ता. कराड येथील शेताच्या बांधावर असलेल्या रायवळ जातीच्या आंब्याच्या झाडाची साल काढून अज्ञाताकडून नुकसान करण्यात आले आल्याची घटना घडली आहे. कोपर्डेहवेली येथील रहिवाशी दत्तात्रय काशिद यांची वडोली निळेश्वर येथे गट क्रमांक 73 वडिलोपार्जित शेती आहे. त्यामध्ये बांधावर रावळ जातीच्या आंब्याचे तीन पिढ्यांचे झाड आहे. त्याला प्रत्येकवर्षी आंबे येत असतात. बुधवारी सकाळी अकरा वाजता ते आपल्या शेताकडे गेले असता त्यांना आंब्याच्या झाडाची साल काढल्याचा प्रकार आढळून आला. त्यांनी तातडीने मसूर येथील वनपाल कार्यालयाशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती कळविली.
झाडांच्या साली काढण्याच्या प्रकारात वाढ
शासनाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.तर दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारे झाडांना आज्ञाताकडून हानी पोहचवण्याचे प्रकार सुरू आहेत. वडोली निळेश्वर ता. कराड येथील शेताच्या बांधावर असलेल्या रायवळ जातीच्या आंब्याच्या झाडाची साल काढून आज्ञाताकडून नुकसान करण्यात आले आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
मी कोपर्डेहवेली येथील रहिवासी असून माझी वडिलोपार्जित जमीन वडोली निळेश्वर येथे आहे. लहानपणापासूनच या झाडांचे आंबे खाल्ल्याने एकप्रकारचे या झाडांवर जीव बसला आहे. घडलेली घटना वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने काळजी घेणे गरजेचे आहे.
दत्तात्रय काशिद ,कोपर्डेहवेली