जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
पाटण – सध्या आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अवघी शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. आचारसंहितेचा धसका भल्याभल्यांनी घेतला आहे. लोकांसाठी म्हणून काही तरी करायला जायचो आणि आचारसंहितेची नसती बिलामत मागे लागायची, त्यापेक्षा निमूटपणे बसण्यात धन्यता एखाद्या व्यक्तीने मानली तर समजू शकेल. पण एखाद्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची एक-दोन नव्हे तर गायी, म्हैशी, बैल अशी दहा गुरेढोरे डोळ्यासमोर आगीत होरपळून मरण पावली असताना त्या शेतकऱ्याला आचारसंहितेच्या नावाखाली तातडीची शासकीय मदत मिळत नसेल तर याआचारसंहितेला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय यंत्रणेला सामाजिक संवेदनेची जाणीव करुन द्यायची कोणी? असा उद्विग्न सवाल विचारण्यात येत असून आता याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तामकडे, ता. पाटण येथील राजाराम बापू पवार यांच्या गुरे बांधलेल्या शेडला दि. 20 मार्च रोजी होळीच्या दिवशी भर दुपारी लागलेल्या आगीत दोन गायी व एक म्हैस, खोंड, कालवड अशी पाच जनावरे जागेवरच होरपळून मरण पावली तर एक म्हैस व पाच बैल ही उर्वरित जनावरे नव्वद टक्के भाजलेल्या अवस्थेत असल्याने ती ही जनावरे जगू शकणार नाहीत. होरपळून गेलेल्या या जनावरांचे असह्य उन्हाळ्यात हाल होत असून असे हाल होण्यापेक्षा त्यांची या मरणयातनेतून सुटका व्हावी, म्हणून त्यांच्या मरणाकडे डोळे लावून बसण्याचे दुर्भाग्य दुर्दैवाने राजाराम पवार यांच्या वाट्याला आले आहे. यातील केवळ एक बैल शिल्लक राहिला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या मंडलाधिकारी तसेच तलाठी यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेत तातडीने पंचनामे केले.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी जनावरांवर उपचार सुरु करुन अहवाल सादर केला. या दुर्घटनेत राजाराम पवार यांची दुभती जनावरे, बैल आदी गुरेढोरे आणि शेती साहित्य असे 5 लाख 14 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेतून सावरण्यासाठी गावकऱ्यांसह अनेक व्यक्ती, संस्था, सार्वजनिक मंडळे मदतीचा हातभार लावत आहेत. पण पंचनामे करुन गेलेल्या शासकीय पातळीवरुन मात्र पंधरवडा उलटूनही अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. जीवापाड जपलेल्या बैलांच्या जीवावर स्वतःच्या तुटपुंज्या शेतीबरोबर इतरांच्या शेती मशागतीची कामे करुन संसाराचा गाडा ओढणाऱ्या राजाराम पवार यांच्या कुटुंबाला दुभत्या जनावरांचा आणि बैलांचा मोठा आधार होता. गेल्या वर्षी मुलीच्या लग्नाचा खर्च डोक्यावर असून पत्नी आणि अवघ्या तिसरीत शिकणाऱ्या मुलाचे पालनपोषण करुन कसाबसा संसाराचा गाडा ओढणाऱ्या राजाराम पवार यांच्यावर काळाने घाला घातला असून पशुधन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घडलेल्या दुर्घटनेचे पंचनामे झाल्यानंतर शासकीय मदतीकडे डोळे लावून बसलेल्या राजाराम पवार यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याची गरज असताना घटनेचे गांभीर्य आणि संबंधित गरीब शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट याबाबतची संवेदनशीलता मात्र शासकीय पातळीवर दिसून येत नाहीत. आदर्श आचारसंहितेच्या काळात घडलेल्या अशा दुर्दैवी घटनेप्रसंगी शासकीय यंत्रणेने सामाजिक संवेदनशीलततेचा आचार आणि दुर्दैवी घटकाला न्याय मिळवून देण्याची संहिता दाखवून देण्याची गरज आहे. संबंधित दुर्दैवी शेतकऱ्याला तातडीने देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचा तो धनादेश देण्यासाठी पंधरा दिवस उलटल्यानंतरही शासकीय यंत्रणा कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहे. या दुर्दैवी प्रसंगातून संबंधित शेतकऱ्याला सावरुन त्याला मदतीचा हातभार लावण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.