वाहनचालकांचा सवाल ः लक्ष्मी कॉलनी ते टेकवडे रस्ता वाहतुकीस धोकादायक
अपघात झाल्यास जबाबदार कोण ?
गॅसवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदून हे काम करण्यात आले. काम पूर्ण झाले तरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे दगडी आणि मुरुमामुळे अपघात झाल्यास त्याला कोणता विभाग जबाबदार राहणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या खोदलेल्या रस्त्यावरून वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्या लगतचा भाग खोदून लक्ष्मी कॉलनी ते टेकवडे पेट्रोल पंप दरम्यान सीएनजीची गॅसवाहिनी टाकण्यात आली. पण पुन्हा रस्त्याची दुरुस्ती केली गेली नाही. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केव्हा करणार असा सवाल वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे.
सीएनजी गॅस पंपावर गॅसवाहिनी जोडण्यासाठी टेकवडे पेट्रोल पंप ते लक्ष्मी कॉलनी येथील नवीन सीएनजी गॅस पंपापर्यंत ही गॅसवाहिनी टाकण्यात आली आहे. गॅसवाहिनी टाकतानाही अनेक दिवस रस्त्याची खोदाई करून ठेवण्यात आली होती. गॅसचे पाईप टाकल्यानंतर ती बुजवण्यात आले. तो मुरूम रस्त्यावर पसरला गेला आहे. या रस्त्यावर नित्याची वाहतूक कोंडी होते. कारण वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेने जाण्याचा प्रयत्न करतात. दुचाकीस्वार वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रस्त्याच्या कडेने जाण्याचा प्रयत्न करीत असतो.
अशावेळी या गडबडीतमध्ये रस्त्यावर असलेल्या मुरमावरून वाहने घसरत आहेत. ही वाहिनी टाकल्यानंतर त्यावर डांबरीकरण त्वरित होणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने वाहनचालकांना खोदाई केलेल्या मार्गावरून जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून अशी परिस्थिती आहे. त्यावर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. जेसीबी मशीनच्या साह्याने रस्ता खोदाई करून ही वाहिनी टाकली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात दगडी आणि मुरूम रस्त्यावर पसरली आहे. या मोकळ्या दगडी मुरमावरून वाहने घसरत असून वाहतुकीच्यादृष्टीने हा मार्ग धोकादायक बनला आहे.