मुंबई- देशाचे नवे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काश्मीरविषयीच्या भूमिकेचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समर्थन केले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सामना’ मधून अमित शाह यांच्या काश्मीरविषयीच्या भूमिकांवर ‘अमित शहा नक्की काय करणार? काश्मीरची शस्त्रक्रिया’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे. या अग्रलेखातून अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला आहे की, ‘काश्मीरत हिंदू मुख्यमंत्री व्हावा व कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हा अजेंडा असेल तर त्यांनी हाती घेतलेले ‘ऑपरेशन’ हे राष्ट्रीय सत्कार्यच आहे.
दरम्यान, ‘अमित शहा नक्की काय करणार? काश्मीरची शस्त्रक्रिया’ या अग्रलेखात लिहिले आहे की, ‘काश्मिरातील विधानसभा जागांचाच ‘भूगोल’ बदलणार नाही, तर संपूर्ण काश्मीरचा भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही. काश्मीरात हिंदू मुख्यमंत्री व्हावा व कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हा नवे गृहमंत्री अमित शहा यांचा अजेंडा असेल तर त्यांनी हाती घेतलेले ‘ऑपरेशन’ हे राष्ट्रीय सत्कार्यच आहे. शहा यांची विचारसरणी लपलेली नाही. ममता बॅनर्जींच्या प. बंगालात घुसून त्यांनी ‘जय श्रीराम’ची गर्जना केली व आता जम्मू–काश्मीरात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा त्यांचा इरादा दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फक्त विधानसभा जागांचाच ‘भूगोल’ बदलणार नाही, तर संपूर्ण काश्मीरचा भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही! काश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!’