प्राणी प्रगणनेची तयारी पूर्ण : बुद्धपौर्णिमेला केली जाणार मोजणी
प्राणिगणना बुद्धपौर्णिमेला का होते?
उन्हाळ्यातच प्राणिगणना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. अशा वेळी जिथे पाणी, तिथे प्राणी आवर्जून जातात. बुद्धपौर्णिमा ही उन्हाळ्यातील सर्वाधिक प्रकाश असलेली रात्र असते. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी पाणवठ्यावर येतील, या हिशेबाने प्राणीप्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणावर मुक्काम ठोकतात. रात्री सगळेच प्राणी एकदा तरी पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जातात.
पुणे – जंगलातील प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ किंवा घट, एखादा नवीन प्रजातीचा प्राणी दाखल झाला आहे का, याच्या नोंदी घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्धपौर्णिमेला प्राणी प्रगणना होणार आहे. यासाठी वनविभागाची तयारी पूर्ण झाली असून यंदा जिल्ह्यातील 170 पाणवठ्यांवर सुमारे 200 हून अधिक वनकर्मचारी, अभ्यासक आणि प्राणिप्रेमी या प्रगणनेत सहभागी होणार आहेत.
वन्यप्राण्यांची प्रगणना ही वर्षानुवर्षे सुरू असलेली पारंपरिक पद्धत आहे. यानुसार बुद्धपौर्णिमेच्या रात्री जंगलातील पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची नोंद घतली जाते. या नोंदीनुसार त्यांची प्रगणना केली जाते. पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर, मयुरेश्वर, ताम्हिणी अभयारण्यात 18 मे रोजी ही प्रगणना केली जाणार आहे. याबाबत वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर. के. वानखेडे म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही ही प्रगणना करणार आहोत.
या उपक्रमात वन कर्मचाऱ्यांसोबतच इतर नागरिकही सहभागी होत असल्याने सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी वन कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच प्रगणनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनाही विभागातर्फे मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 170 पैकी 50 पाणवठ्यांवर स्थानिक नागरिक तसेच वन कर्मचारीइतर नागरिक सहभागी होणार आहेत. रात्रभर जागून वन्यप्राण्यांच्या नोंदी घेण्याचे काम या लोकांवर असते.’ “या उपक्रमात होणारी प्रगणना अचूक नसली, तरी वन्यप्राण्याबाबत माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळेच ही प्रगणना महत्त्वाची आहे. या गणनेतील अचूकता वाढावी, यासाठी वनविभागाकडून बुद्धपौर्णिमेच्या 1 महिना आधीदेखील पाणवठ्यावरील नोंदी घेतल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.