निवडणुकांनंतर ममतांचा अहंकार गळून पडेल
कोलकाता – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधील राजतंत्र हे आता गुंडाराजमध्ये बदललंय, अशी टीका नक्वीनी केली आहे.
बंगाल हे राज्य आता गुंडाराजची प्रयोगशाळा बनली आहे. राज्याचे राजतंत्र गुंडाराजमध्ये बदललंय. गुंडाराज पसरविणाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या टीकेवरून हे दिसून येतंय की त्यांना आपल्या संविधानावर विश्वास नाही. 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ममता दिदींचा अहंकार छूमंतर होणार आहे. 23 मे रोजी देशातील काही पक्षांना त्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे, अशी टीका नक्वी यांनी केली आहे.
यावेळी नक्वी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवरूनही तृणमूल कॉंग्रेसवर निशाणा साधला. तेथे रोज असे प्रकार घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी भाजपचे बूथ अध्यक्ष नरेंद्र मंडल यांची हत्या, लोकसभा उमेदवार भारती घोष यांच्या ताफ्यावर हल्ला, भाजप नेत्यांच्या घराची तोडफोड केली जात आहे. लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी होण्यापासून भाजप कार्यकर्त्यांना रोखले जात आहे. कारण तृणमूल कॉंग्रेसला माहीत आहे की पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होणार आहेत, असे नक्वी यांनी यावेळी सांगितले.