पुणे – मराठा प्रवर्गातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 228 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊ नये म्हणून सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वागत केले. सरकारने वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विषयात जातीने लक्ष घातल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आता थांबणार आहे, असे मत “अभाविप’ महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात प्रथमच लागू झालेल्या मराठा आरक्षण प्रवर्गात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश झाले. यामध्ये जवळपास 228 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले; परंतु सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावरील आव्हान मिळालेल्या याचिकेवर निर्णय देताना वरील प्रवर्गातील सर्वच प्रवेश रद्द करण्याचा निर्णय दिला. यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून या प्रकरणातील घोळ सुरू होता. सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश हे ग्राह्य धरले जावेत व सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी संघटना आणि विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलने केले होते, अखेर सरकारनेही ते सर्व प्रवेश कायम राहावेत यासाठी अध्यादेश जारी केला. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 228 प्रवेश कायम राहणार असल्याचे संघटनेने नमूद केले.