“मनमर्जियां’मध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशलची जोडी पडद्यावर खूपच छान दिसली होती. ऑफस्क्रीन देखील हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये दोघेही आले होते, तेव्हा त्यांनीच ही गोष्ट सांगितली आहे. याच गप्पा गोष्टींदरम्यान तापसीने आणखी एक गोष्ट कबूल करून टाकली. तिला म्हणे विकी कौशलबरोबर लग्न करायचे आहे. तिने त्याला आपला “लाईफ पार्टनर’ म्हणून पसंत केले आहे. “हुक अप, मॅरी ऍन्ड किल’ या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तापसीने “वरुण धवनबरोबर हुक अप, अभिषेक बच्चनला किल आणि विकी कौशलबरोबर मॅरी’ असे उत्तर दिले.
विकी हा वरुण धवन किंवा हृतिक रोशनसारखा हॉट दिसत नसला, तरी त्याच्यामध्ये “मॅरेज मटेरियल’ इतरांपेक्षा खूप जास्त आहे. तसे तर सर्व पुरुष “अच्छे’ असतात. पण विकी कौशल “बेस्ट’ आहे, अशा शब्दात तापसीने विकीचे कौतुक केले आहे.
विकीला जेव्हा या समीकरणाबाबत विचारले तेव्हा तो नुसताच हसला. तापसी खूप बडबड करत असते. अगदी निरर्थकही बोलायला तिला खूप आवडते. तर तो स्वतः मात्र चांगला लिसनर आहे. समोरचा माणूस जे काही बोलतो, ते व्यवस्थित ऐकायला त्याला आवडते. यामुळेच दोघांमध्ये चांगले समीकरण जुळले आहे. अन्यथा हे जमणे कठीण होते. तापसी अगदी मनमोकळी, पारदर्शक आहे. आत एक, बाहेर एक असली भानगड नाही. अनुराग कश्यपच्या डायरेक्शनखाली “मनमर्जियां’चे शुटिंग सुरू करण्यापूर्वीपासून दोघे व्हॉट्स ऍपवर कनेक्टेड होते. तेव्हापासूनच ही दोस्ती सुरू झाली होती.
तापसीचा यापूर्वीचा “बदला’ आणि विकीचा “उरी- सर्जिकल स्ट्राईक’ दोन्ही सुपरहिट झाले आहेत. आता तापसीकडे “गेम ओव्हर’, “सांड की आंख’ त्यानंतर “मिशन मंगल’ यासारख्ये महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तिला पार पाडायचे आहेत. तर विकीला सरदार उधम सिंगांच्या बायोपिकमध्ये ऐतिहासिक रोल करायचा आहे.