संतोष कोकरे
मद्यधुंद वाहन चालकांमुळे अपघातांत वाढ
निसर्गरम्य ठिकाणाचे विद्रुपीकरण
दरम्यान, कास पठार आणि परिसरात याठिकाणी पार्टीसाठी आलेल्या हुल्लडबाज टोळक्यांकडून वणवे लावले जात आहेत. त्यामुळे वनसंपदा जळून खाक होत आहे. तर दारूच्या बाटल्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्याचबरोबर प्लास्टिकचा कचरा या ठिकाणी फेकला जात असल्याने नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.
ठोसेघर – सातारा कास मार्गावर गेल्या काही काळापासून अपघातांमध्ये वाढ होत आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेकांनी अपघातामध्ये आपला जीव गमावला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी बहुतांश अपघात हे मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवताना झाले आहेत. त्यामुळे कास रोडवरील प्रवास हा मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकांमुळे असुरक्षित बनला आहे.
सध्या सूर्यनारायणाने रौद्ररूप धारण केले असल्याने सातारा शहराचा पारा चाळीस अंश पार गेला आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीकाळ सुटका मिळवण्यासाठी सातारा शहर आणि इतर ठिकाणचे पर्यटक निसर्ग सौंदर्याने नटलेलं आल्हाददायक वातावरण अनुभवायला आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारसह कास तलाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. अशातच कास परिसर आणि या मार्गावर जागोजागी हुल्लडबाज आणि मद्यपींचा धिंगाणा या पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे. यापैकी बहुतांश मद्यपी हे दारूच्या नशेत झिंगाट होऊन आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने बेदरकारपणे भुंगाट दामटताना दिसतात. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.
सातारा कास मार्गावरील रस्ता हा अरुंद आणि काही ठिकाणी घाट त्याचबरोबर तीव्र उताराचा आहे. त्यामुळे आधीच या रस्त्यावरील प्रवास हा काही प्रमाणात कसरतीचा आहे. त्यातच या मार्गावर मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहने चालवली जात असल्याने अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारूच्या नशेत झिंगेलेल्या तरुणांच्या टोळक्यांच्या गाड्यांची रेस या मार्गावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे काहीजण रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्ड्यात आदळतात तर काही झाडावर जाऊन धडकतात तर काहीजण समोर येणाऱ्या वाहनांना ठोकरतात. त्यामुळे वादावादीचे प्रसंग ओढवत आहेत तर या मद्यधुंद तरुणांकडून दादागिरी करून वाद घातले जात आहे. त्यामुळे या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशी आणि पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कास पठारावरील फुलांच्या हंगामाच्या काळात याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची जागोजागी उभारलेल्या चेक पोस्टवर काटेकोरपणे तपासणी केली जाते. परंतु, त्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे कास परिसर हा मद्यपी आणि हुल्लडबाजांच्या रडारवर आला आहे. परंतु, याचा फटका स्थानिक नागरिक आणि इतर पर्यटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसराला झिंगाट तळीराम आणि हुल्लडबाजांचे लागलेल्या ग्रहाणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.
कास तलाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर ओल्या पार्ट्या होत असून यामुळे स्थानिक ग्रामस्थांना या तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या नशेत रस्त्यामध्येच गाड्यांमधील म्युझिक सिस्टिमचा मोठा आवाज सोडून धिंगाणा घातला जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर गावाच्या हद्दीत गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या ओल्या पार्ट्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
विष्णू किर्दत अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, कासकास रोड आणि परिसरात पोलीस पथकाच्या पीसीआर व्हॅनची कायम गस्त असते. त्याचबरोबर सुट्ट्यांच्या दिवशी एक विशेष पथक तैनात करण्यात येते. यापुढे कास रोड आणि तलाव परिसरावर पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. या परिसरात हुल्लडबाजी आणि मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
आप्पासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस स्टेशन