उध्दव ठाकरे: युती ही दोन-चार पदांसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी
कोल्हापूर- येत्या रविवारी उध्दव ठाकरे मराठवाडा विदर्भाचा दौरा करणार आहेत, यावेळी दुष्काळग्रस्तांना केवळ सहानुभुती न दाखवता अन्नधान्याचे वाटप करणार असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच शिवसेनेला मिळालेल्या अवजड खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र आता हा प्रश्न मिटल्याचे आणि युती ही दोन-चार पदांसाठी नव्हे, तर हिंदुत्वासाठी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्या देहयष्टीकडे पाहत हास्य करून आपण नाराज नसल्याचे दाखवून दिले. अंबाबाई आणि एकविरा देवीच्या दर्शनंतर आता 16 तारखेला अयोध्येला जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. अयोध्येची तारीख अधिकृतरित्या दोन दिवसात जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकीसाठी आमचं ठरलंय म्हणत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर जास्त बोलणे टाळले.
लोकसभा निवडणुकांनंतर एनडीएचे सरकार स्थापन झाले. यानंतर शिवसेनेच्या वाट्याला फक्त एक मंत्रिपद आले. यानंतर आता शिवसेनेने लोकसभा उपसभापतीपदावर दावा केल्याचे वृत्त होते. शिवसेना फक्त एक मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर एखादे मनोगत व्यक्त करणे, म्हणजे नाराजी नाही, जे आहे ते हक्काने मागू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. निवडणुकीपूर्वी अंबाबाई चरणी मागितलेला नवस फेडण्यासाठी ठाकरे आपल्या नवीन खासदारांच्या समवेत कोल्हापूरला आले होते. त्या नंतर उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईंच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
ठाकरे म्हणाले, देवीच्या चरणी नतमस्तक व्हायला मी आलो आहे. तसेच कोल्हापूरकरांना त्यांनी मानाचा मुजरा घातला. यंदा कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार निवडूण आला आहे. कोल्हापूरकरांनी इच्छा पूर्ण केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले. तसेच तुमच्या आशीर्वादाला तडा जाऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.