पिंपरी – सध्या पाणी कपात सहन करत असलेले नागरीक यंदा मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबले असल्याने चिंतेत आहेत. मॉन्सूनचे आगमन लांबले जरी असले तरी जुलै अखेरपर्यंत पुरु शकेल, इतके पाणी पवना धरणात अजून शिल्लक आहे. मॉन्सूनचे आगमन 17 जूनच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॉन्सून सुरू झाल्यानंतरही एक महिना पुरेल इतका अर्थात 18.02 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी जुलैअखेर पर्यंत पुरणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी शहरासाठी आणखी पाणी कपात करण्याची गरज नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने सुरवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले होते. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले आहे. पवना धरणात सध्या एकूण पाणीसाठा 74.58 दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यातील उपयुक्त साठा 43.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही.
मॉन्सूनच्या आगमनाला झालेला उशीर, धरण क्षेत्रातील खालावत चाललेला पाणीसाठा लक्षात घेता पुणेमहा पालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवडला देखील पाणीकपातीत आणखी वाढ करावी लागते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनिक “प्रभात’ने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून नेमकी स्थिती जाणून घेतली आहे. जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी असले तरी धरण शंभर टक्के कधी भरणार? परतीच्या पावसाचा अंदाज या सर्व बाबींचा विचार करुनच प्रशासन पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेईल. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पवना धरण शंभर टक्के भरले होते, परंतु काळात परतीचा पाऊस अपेक्षेनुसार न झाल्याने यावर्षी पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.
“”पवना धरण क्षेत्रात सध्या उपलब्ध असलेले पाणी शहरासाठी पुरेसे आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे लगेचच आणखी पाणी कपात करण्याची महापालिकेला गरज भासणार नाही.”
– मकरंद निकम, सह-शहर अभियंता