नियोजन “पाण्यात’ : वडगावकरांची तहान भागविणाऱ्या बंधाऱ्याची दुरवस्था
मुबलक पाणी अन् पाण्यासाठी भटकंती
सुमारे 30 हजार लोकसंख्या असलेल्या वडगावला विविध भागात आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. 410 लाख लिटर एवढी साठवण क्षमता या टाक्यांची आहे. तसेच केशवनगर भागासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. त्याप्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तर काही ठिकाणी उच्च प्रमाणात पाणी येते. त्यामुळे काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
वडगाव मावळ – वडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ येथील बंधारा देखभाल दुरुस्तीअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. दुरवस्था झालेल्या बंधाऱ्यातून पाण्याची संततधार (लिकेज) सुरू आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मुबलक पाणी असूनही काही भाग पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
गावाकडून शहराकडे धावणाऱ्या वडगाव शहरात पूर्वीपासून ग्रामपंचायत अस्तित्वात होती. ती बरखास्त होऊन नगरपंचायतमध्ये समावेश झाला. नळपाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांना अर्धा इंच पाईपलाईन टाकून नळजोड द्यायचा नियम आहे. परंतु ग्रामपंचायत असताना अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवून एक इंची पाईपलाईन टाकून नळावाटे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना मुबलक पाणी मिळते, तर काहींना थेंब थेंब पाणी
मिळत आहे.
इंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा उभारला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जातो.
लोकसंख्येच्या मानाने शहराला मुबलक पाणी असतानाही शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नगरसेवकांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. वडगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेला जांभूळ येथील बंधारा पूर्णपणे निकामी झाला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.