राहुल पाटील : महेश शिंदे यांनी केला खटावकरांसाठी स्वखर्चातून पाणीपुरवठा
खटाव – गावातील प्रत्येक घराला दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य आहे व त्याची जाणीव देखील आहे. मागील 15 ते 20 वर्षातील हा सर्वात मोठा दुष्काळ आहे. गावाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटत आहोत व नागरिकांसाठी पाण्याची सोय करत आहोत. ग्रामस्थांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.
खटाव येथे भाजपा युवा नेते महेश शिंदे यांच्या स्वखर्चातून ग्रामस्थांना टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठ्याचा शुभारंभ करते प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, बबन विधाते, राहुल जमदाडे, दिपक विधाते, संजय टकले, केशव धुमाळ, पोपट भराडे, उत्तम बोर्गे, मुसा काझी, प्रल्हाद घोरपडे, दादा मोहिते, सुधाकर पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, खटावला अडीच कोटींची महाजल योजना झाली असल्याने टॅंकर मंजूर होण्याला वेळ लागला. ज्या विहिरीतून खटाव गावाला पाणीपुरवठा होतोय त्या विहिरीत दरूज व दरजाई यांना देखील वाटा देण्यात आला आहे. सत्ता परिवर्तन विरोधकांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी खटावमधील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप्स ठिकठिकाणी फोडण्याचे, पाणी तोडण्याचे महापाप केले. गेल्या वीस वर्षात तुम्ही गावासाठी काहीही करू शकला नसल्याने नागरिकांनी तुम्हाला घरी बसवले आहे याचे भान ठेवावे. जे तुम्हाला वीस वर्षात जमले नाही त्याची आमच्याकडून केवळ दोन महिन्यात कशी अपेक्षा ठेवता असा सवाल त्यांना विरोधकांना यावेळी केला. मात्र पुढच्या वर्षापासून खटावकरांना पाण्याची एवढी टंचाई जाणवणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.