औज बंधारा कोरडा ठणठणीत ; उजनी वजा 37.40
पाच किंवा सहा दिवसाड पाणीपुरवठा करावा लागणार
सोलापूर, (प्रतिनिधी) – सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणी पातळी शून्यावर येऊन बंधारा पूर्णपणे कोरडा ठणठणीत पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात सोलापूरकरांना पाच किंव्वा सहा दिवसाड पाणीपुरवठा करण्याची पाळी महापालिका प्रशासनावर येणार आहे.
सोलापूर शहराला काही महिन्यापूर्वीच उजनी धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. परंतु उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर झालेले बाष्पीभवन तसेच सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरण्यात आल्याने औज बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ आजमितीला फक्त 9 फुट पाणी असून हे पाणी केवळ आठवडाभर सोलापूरकरांना पुरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उजनी धरणात वजा 37. 40 टक्के पाणी असून उद्या बुधवारपासून सोलापूरची उजनीतून पाणी सोडल्यास औजला हे पाणी पोहोचण्यास 30 मे उजाडेल. तोपर्यंत मात्र सोलापूरकरांना पाच किंव्वा सहा दिवसाड पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. उजनीमधून सोलापूरसाठी पाणी सोडल्यास उजनीचा पाणीसाठा थेट 10 टक्यांनी कमी होणार आहे. सध्या उजनीवर धरणामधून दुबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास तिबार पंपिंग करावे लागेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.