सातारा – पाटबंधारे विभागाकडून उरमोडी धरणातून नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनात सातत्याने अनियमितता येत आहे. त्यामुळे सातारा शहरासह परळी भागातील चौदा गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आवर्तनाची वेळ व कोटा यांच्यात बदल न झाल्यास पाणीबाणीची झळ सातारा तालुक्याला बसू लागली आहे. बदल होत असल्याने नदीवरील बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. उरमोडी धरणाची क्षमता 9.79 टीएमसी असताना आजमितीला उपयुक्त पाणी साठा 4 .10 टीएमसी इतका आहे .
उरमोडीची आवर्तने माण खटावच्या दुष्काळामुळे वेळेत होत असली तरी सातारा तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होऊ लागली आहे . त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात सातारा तालुक्यातील उरमोडी नदीकाठच्या अनेक गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी घटली आहे. आसनगाव , मांडवे ते नागठाणे या नदीच्या मार्गावर सध्या पाण्याचा खडखडाट झाला आहे . त्यामुळे उरमोडी नदी काठच्या नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.
सातारा तालुक्याच्या पश्चिमेस परळी खोऱ्यातून वाहत असलेल्या उरमोडी नदीवर परळी येथे धरण बांधण्यात आले आहे.तसेच अनेक ठिकाणी या नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारेही बांधण्यात आले आहेत.या धरणामुळे व बंधाऱ्यांमुळे काही महिने वाहणारी ही नदी आता बारमाही वाहत आहे. या नदीच्या पाण्यावरच सातारा शहरासह तालुक्यातील अनेक गावाची पिण्याच्या पाण्याच्या उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. तसेच या नदीपात्रातून शेतीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असतो.
यामुळे हा परिसर कायम बागायत म्हणून ओळखला जात असून अनेक गावांच्या ऐन उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली होती. मात्र बदलत्या काळानुसार व वाढत्या लोकसंख्येमुळे या नदीपात्रातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे येथील बंधारे लवकरच कोरडे ठणठणीत पडत आहेत. त्यातच धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनात मोठा फरक पडत आहे. त्यामुळे या नदीपात्रात असणाऱ्या अनेक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींची कोरड्या पडत असल्याने ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच या परिसरातील जनतेवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका असे,संतप्त नागरीकांनी बोलताना सांगितले.
दरम्यान सातारा तालुक्यातील नागठाणे हे राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण मानले जाते. तसेच बाजारपेठेचे गाव असून या गावाची लोकसंख्या सुमारे 20 हजाराच्या आसपास आहे. या गावचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी उरमोडी नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. यातून काही दिवस पाणी साचवून ठेवतो. पण तोही आत्ता गाळाने पूर्ण भरला असून या बंधाऱ्याच्या वर नदी पात्रातील गाळ काढणे गरजेचे आहे. या गाळ काढण्याचा परवानगीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. मात्र तो मंजूर झाला नाही. लोकप्रतिनिधी वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ ओढवली नसती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.