नारायणगाव – हिवरे तर्फे नारायणगाव या गावात तीव्र दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीकडे टॅंकर सुरू करण्याची मागणी सरपंच स्वरूपा विधाटे आणि उपसरपंच सुधीर खोकराळे यांनी केली आहे.
हिवरे ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे नियोजन उत्तमरीत्या केले गेले आहे. अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती. गावच्या एका बाजूने मीना शाखा कालवा गेला आहे, तर दुसऱ्या बाजूने मीना नदी आहे. दोन्ही बाजूंनी पाण्याचे स्रोत असल्याने आजपर्यंत या गावाला कधीही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला नव्हता. गावातील महिलांवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. 1972च्या दुष्काळानंतर प्रथमच या गावात पिण्याच्या पाण्याची इतकी मोठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हिवरे गावची लोकसंख्या 5 हजारांच्या आसपास आहे.
गावठाण वस्तीवर सुमारे 307 कटुंब वास्तव्य करत आहेत, तर अन्य कुटुंब ही मळ्यांत राहत आहेत. हिवरे ग्रामपंचायतीच्या वतीने 307 कुटुंबांना पाणी पुरवठा केला जात आहे. यापूर्वी या गावात शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत होती. शेतकरी देखील शेतीच्या पाणी टंचाईचा विचार करून त्याप्रमाणे नियोजन करत होते. वेळप्रसंगी शेती मोकळी ठेवली जात होती, तर कधी कधी शेतातील पिकं पाण्याअभावी जळून देखील जात होती. विशेष म्हणजे आजपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कधीच उद्भवला नव्हता. पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबविल्या. यामुळे यापूर्वीच्या काळात पडलेल्या तीव्र दुष्काळात देखील या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे मुबलक उपलब्ध होत होते; मात्र चालू वर्षीच्या दुष्काळाची दाहकता इतकी भयानक आहे की, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणारे तीन बोअरवेल, चार हातपंप, एक विहीर देखील कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच हिवरे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतने नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीकडे टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
– स्वरूपा विधाटे, सरपंच हिवरे तर्फे नारायणगाव
शेजारील गावेही तहानलेलीच
खोडद गावात सुमारे 250 कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा केला जातो पण पाणी पातळी खालावल्याने सध्या दर दोन दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. गावात एकूण 9 हातपंप असल्याने नागरिक हातपंपावरून देखील पाणी आणतात पण पाणी पातळी खालावल्याने हातपंपातून देखील सध्या पाणी मिळत नाही. मांजरवाडीत ग्रामपंचायतीच्या वतीने एकूण 175 कुटुंबांना पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या मांजरवाडी मध्ये आठवड्यातून 3 दिवस टॅंकर द्वारे पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.