पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांची मागणी
– बाळासाहेब मुळीक
यवत – यावर्षीचा पावसाळ्याचा हंगाम जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला असला तरी जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस समाधानकारक झाला असून, धरण भरले आहे. या धरणक्षेत्रावर अवलंबून कालव्यांना पाणी आले असल्याने आता या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांसह सरकारी खात्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाने इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. खडकवासला धरणाच्या मुळा-मुठा उजव्या कालव्याच्या पाण्यावर आणि नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हवेली, दौंड, इंदापूर येथील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अजूनही चिंताग्रस्त आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे; मात्र तरीही दौंड तालुक्यात पाण्याअभावी काही ठिकाणी अद्यापही पाणीपुरवठा करण्यासाठी तीस टॅंकर सुरू असल्याचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी सांगितले. दौंडमधील दक्षिण पट्ट्यातील भागातील गावांचे ओढे, नाले, तलाव पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आत्ताच भरल्यास या भागातील शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळून उन्हाळ्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही.
यावर्षी बहुतेक भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत; मात्र चालू आठवड्यात पावसाने ओढ दिली आहे. पुढील काळात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास या भागात दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने दौंड, पुरंदर, बारामती या तालुक्यांसाठी पुरंदर उपसा सिंचन योजना व जनाई-सिरसाई योजना सुरू केल्या आहेत. मात्र, सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी या योजनांचा म्हणावा तसा शेतकऱ्यांना लाभ होत नाही.
शेतकरी-अधिकारी संघर्ष टाळावा
दौंड तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील डाळींब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, भरतगाव, कासुर्डी, यवत, भांडगाव, वाखारी, खोर, देऊळगाव गाडा या गावांना पाण्याचा लाभ होत नाही. ऐन उन्हाळ्यात नदीचे पाणी कमी होत असल्याने शेतकऱ्यांची पुरंदर उपसा सिंचन योजनेवरून पाण्याची मागणी वाढत आहे. यातून नदीकाठचे शेतकरी व पुरंदर उपसा योजनेवर अवलंबून असलेल्या शेतकरी व अधिकारी यांच्यामध्ये पाण्यासाठी मागील वर्षी संघर्ष पाहायला मिळाला होता. उन्हाळ्यात होणाऱ्या बिकट स्थितीची वाट न पाहता आत्ताच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून दौंड तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील गावांचे ओढे, नाले, तलाव भरल्यास या गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळून उन्हाळ्यातही पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होणार नाही.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खुपटेवाडी फाट्याला पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या असून पाणी सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– राहुल कुल, आमदार, दौंड
पुरंदर उपसा सिंचन योजनेतून दौंड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या खुपटेवाडी फाट्याला पाणी सोडून तलाव भरण्यात यावेत. त्यामुळे लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यासाठी आमदार राहुल कुल यांनी प्रयत्न करावेत.
– एम. जी. शेलार, अध्यक्ष खुपटेवाडी फाटा कृती समिती