संतांनी समाजाला भक्तीची गोडी लावली. पाप-पुण्याच्या संकल्पनेतून आचारा-विचारांच्या शुद्धतेची अपेक्षा व्यक्त केली. आराध्य दैवताचे मनभावे पूजन मुक्तीच्या कळसापर्यंत घेऊन जाते याची खात्री दिली. प्रबोधनाचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी सुमारे पाचशे वर्षांच्या मोठ्या कालखंडात केले. चांगले काय आणि वाईट काय हे समजवले. हे सारे करीत असताना अठरापगड जातीच्या स्त्री-पुरुषांना एकत्र आणण्याचे महत्कार्य त्यांनी ज्या तळमळीने केले, त्याचे महत्त्व वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील.
आपल्याभोवती वावरणारे सारे आपले बांधव आहेत, हा उदात्त भाव माणसाच्या मनात निर्माण करण्यासाठी प्रबोधनाच्या मार्गाने जे काही सांगायचे ते तर संतांनी सांगितलेच पण “विठू माऊली’ म्हणवणाऱ्या आपल्या आराध्य दैवताची आपण मुलं आहोत, तेव्हा “आपल्यात कसला भेदाभेद’ हा तर्कही त्यांनी वारकऱ्यांच्या मनात अतिशय चांगल्या पद्धतीने रुजवला. त्याचे फलीत आज लाखो वारकरी पंधरा-वीस-पंचवीस दिवस एकत्रितरित्या पायी वारी करताना वा कुठे ना कुठे काही काळासाठी एकत्र येतात, परंतु हा मोठा, तो लहान, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ, हा उच्च तो नीच असा कुठलाही भेद कुठोही दिसून येत नाही, ही अनन्यसाधारण महत्त्वाची बाब म्हणावयास हवी.
सामाजिक प्रबोधन हे पुरोगामी महाराष्ट्राचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, त्याचसोबत ते मराठी भूमीचे बलस्थानही ठरले आहे. मात्र, या प्रबोधनाची पार्श्वभूमी खऱ्याअर्थाने संतांनी निर्माण केली आणि त्या वाटेवर नंतरच्या काळात समाजसुधारक लेखन-व्याख्यानांच्या माध्यमातून चालत राहिले. संतांच्या मांदियाळीतील एकही संत असा नाही की, ज्याने सामाजिक प्रबोधनासाठी काव्य लिहिले नाही. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार, वकुबानुसार, प्रतिभेनुसार समाजाला डोळस जागृतावस्था येण्यासाठी सर्वांगाने प्रयत्न केले आणि मुख्य म्हणजे त्या पाठीशी त्यांची अत्यंत प्रामाणिक आंतरिक तळमळ होती. समाजाने नीतीने वागावे यासाठी संतांनी सातत्याने संस्काराचे खतपाणी घातले आणि त्याची फलश्रृती उत्तम प्रकारच्या निर्मितीत झालेली दिसते.
जगद्गुरू तुकोबाराय एका अतिशय सुप्रसिद्ध अभंगात म्हणतात, “”विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। आईकाजी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा। कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे। तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदुःख जीव भोग पावे।”
प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा अभंग भेदाभेद अमंगळ असल्याचे सुस्पष्ट शब्दात सांगतो. कोणाचा मत्सर करण्याऐवजी सत्याची कास धरायला हवी, कारण आपण सारे एकाच देहाचे अवयव आहोत, त्यामुळे इतरांचे सुखदुःख-भोग हे सारे बघितल्यास ते आपलेच आहेत, असे वाटू लागेल, असे तुकोबा साऱ्यांना सांगतात. समाजात मुरलेला उच्चनीचभाव दूर करण्याचा संतांनी कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळेच “जातीभेद अमंगळ’ ठरतो. श्रेष्ठ भक्ती करणारा भक्त श्रेष्ठत्वाची प्राप्ती करू शकतो, त्यासाठी तो अमूकच जातीधर्माचा पाहिजे अशी कुठलीही अट वारकरी संप्रदायामध्ये नसल्याने त्या पाठीशी रुजलेली प्रबोधनाची विचारसरणी संतांनी प्रयत्नपूर्वक मांडलेली आहे. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत संत चळवळीचा पाचशे वर्षांचा प्रदीर्घ कालखंड समाजातील भेदाभेद ओव्या, अभंग, कीर्तन, भारूड या वाङमयातून दूर करण्याचा कालखंड आहे. म्हणूनच संतांच्या मांदियाळीत अठरापगड जातीचे संत निर्माण झालेले दिसतात. “सामाजिक समता’ हे सूत्र भक्तीमार्गाचा अवलंब करताना साऱ्यांनी स्वीकारल्यानेच इतर भक्ती संप्रदायांच्या तुलनेत वारकरी संप्रदायाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळालेली दिसते.
पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी शुद्ध अंतःकरण, शुद्ध आचरण असणारा, नीतीवान, संप्रदायाची तत्त्वे पाळणारा, सामाजिक समता स्वीकारणारा असा असतो, त्यामुळे माझ्या सोबत असणारा दुसरा वारकरी कोणत्या जातीधर्माचा आहे याच्याशी त्याला कधीही कर्तव्य नसते. “यारे यारे लहान थोर’ या संतांच्या हाकेत अठरापगड जातीधर्मांच्या लोकांनाच आवाहन केलेले आहे.
कर्मकांडाचे थोतांड बाजूला करून धर्मविषयक भ्रामक समजुतींनाही संतांनी तिलांजली दिली. लोकांच्या भाषेत लोकांना समजावण्याची संतांची युक्ती “भेदाभेद भ्रम अमंगळ’ ठरविण्याकामी कमालीची यशस्वी झाली.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. र. रा. गोसावी यांच्या मते, “”वारकरी संप्रदायाने सामाजिकी नीतिमत्तेची पातळी उंचावण्यासाठी दया, क्षमा, शांती, सत्य,अहिंसा या पाच श्रेष्ठ तत्त्वांचा आधार घेतला आणि त्याद्वारे सुसंपन्न व आदर्श जीवननिर्मिती केली, हे वारकरी संप्रदायाच्या कार्याचे फलित होय.”
समाज सांधण्यासाठी जे जे काही करता येईल, ते प्रयत्न वारकरी संप्रदायाने केले. त्यातून “सद्गुणांचा पुरस्कार आणि दुर्गणांचा धिक्कार’ हे सूत्र आपोआप अंगीकारले गेले. म्हणूनच “तरी भले देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।’ असे तुकोबाराय म्हणतात. भेदाभेद मिटविण्यासाठी उभा ठाकलेल्या वारकरी संप्रदायाचे सामाजिक कार्य अनन्यसाधारण आहे यात शंका नाही.