-वाई तालुक्याच्या पूर्व भागात वाढली दुष्काळाची दाहकता
-चांदकसह परिसरात पाण्यासाठी सुरु आहे वणवण
-एकाच हातपंपावर पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड
-लोकप्रतिनिधींना राहिलं नाही गांभीर्यजिल्ह्यातील माण-खटावप्रमाणेच वाई तालुक्याच्या पूर्व भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी येथील जनतेची फरफट सुरु आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे वारंवार आपलं गाऱ्हाणे मांडूनही त्यांच्याकडून कोणतीही ठोस उपाय योजना होताना दिसत नसल्याने या लोकप्रतिनिधींना दुष्काळंच कसलही गांभीर्य राहिलेलं नाही हे मात्र नक्की.
मयूर सोनावणे
सातारा – वाई तालुक्याच्या पूर्व भागातील चांदकसह इतर गावांमध्ये मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सध्या या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवसभर ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पाण्याच्या शोधात फरफट सुरु आहे. दरम्यान, चांदक गावातील शाळेनजीक असणाऱ्या एकाच हातपंपावर पाणी भरण्यासाठी दिवसभर ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे या हातपंपालाही तासभर पाणी येत आहे. त्यानंतर दोन-तीन तास पाणीच येत नाही. त्यामुळे याठिकाणी पाणी भरण्यासाठी आता ग्रामस्थांना रात्रही जागुन काढावी लागत आहे.
मराठवाडा-विदर्भासह राज्यभरात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव या कायमस्वरुपी दुष्काळी संबोधल्या जाणाऱ्या तालुक्यांप्रमाणे इतर तालुक्यांमध्येही दुष्काळाच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. पाच तालुक्यांची तहान भागविणाऱ्या धोम-बलकवडी तसेच धोम या मोठ्या धरणांसह इतरही बारीक मोठी धरणे असणाऱ्या वाई तालुक्याच्या पूर्व भागातील जनताही आता दुष्काळात होरपळू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या आनंदपूर, चांदक, गुळुंब, केंजळ यासह परिसरातील गावांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या समस्येने तीव्र रुप धारण केले आहे.
मार्च महिन्यापासूनच या गावांमधील जनतेला पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यावर प्रशासनाकडून टॅंकर उपाययोजनाची मलमपट्टी लावली. मात्र या मलमपट्टीतही सातत्य राहिले नसल्याने सध्या पाण्याअभावी येथील लोकांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे. विशेष म्हणजे येथील शेतकऱ्यांनी पाण्याअभावी आपली जनावरेही विकायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी या गावाला भेटी दिल्या. तसेच तुम्ही मला मत द्या अथवा देऊ नका मी तुमचा पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही, अशी आश्वासनेही दिली.
मात्र, अद्यापपर्यंत या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ना लोकप्रतिनिधी या गावांकडे फिरकले आहेत ना प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी. त्यामुळे पाणी प्रश्नावर नेमकी दाद तरी मागायची कुणाकडे असा प्रश्न येथील जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. दरम्यान, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी या गावांकडे केलेले दुर्लक्ष हे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर उमटल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की.
पाण्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी?
ज्या तालुक्यातील धरणावर इतर तालुक्यातील जनतेची तहान भागविली जाते, त्याच तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र सर्वसामान्य जनतेची पाण्यासाठी होत असलेली ही फरफट दिसत असतानाही लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही तर त्याहून खेदजनक गोष्ट आहे. तालुक्याच्या पुर्व भागात झालेली दुष्काळजन्य परिस्थिती ही या वर्षीच निर्माण झालेली नाही तर दरवर्षीच उन्हाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती असते. त्यामुळे आमची पाण्यासाठी होत असलेली ही फरफट थांबणार तरी कधी असा आर्त सवाल येथील जनतेतून व्यक्त होत आहे.