बराक क्रमांक 12 सज्ज
मुंबई -भारताबाहेर पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रतीक्षेत येथील आर्थर रोड तुरूंग आहे. ब्रिटनने नीरवला भारताच्या ताब्यात सोपवल्यास त्याची रवानगी आर्थर रोड तुरूंगात होईल. त्यादृष्टीने तुरूंग प्रशासनाने बराक क्रमांक 12 सज्जही ठेवली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) कोट्यवधी रूपयांचा चुना लावून नीरव भारताबाहेर पसार झाला. लंडनमधील स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला 19 मार्चला अटक केली. त्याला परत आणण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. त्याच्या विरोधात ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. तो ताब्यात आल्यास त्याला ठेवण्यात येणाऱ्या आर्थर रोड तुरूंगामधील स्थिती आणि सुविधा याबाबतची माहिती केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून मागितली.
त्यानंतर मागील आठवड्यात तुरूंग विभागाने राज्याच्या गृह विभागाला संबंधित माहिती दिली. ती राज्य सरकारने केंद्राकडे सुपूर्द केल्याचे समजते. अशाच प्रकारची माहिती मागील वर्षी मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याशी निगडीत प्रकरणातही देण्यात आली होती. मल्ल्याही ब्रिटनमध्येच आहे. नीरव आणि मल्ल्या भारताच्या ताब्यात आल्यास त्या दोघांनाही एकाच बराकीत ठेवले जाण्याची शक्यता आहे.