अनिल काटे
मेणवली – वाई शहर गेले काही वर्षे अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. अनधिकृत बांधकामे, वाहतूक समस्या, व्यापारी गाळ्यांचे लिलाव, यात्रा निवासाचे ड्रेनेज, पार्किंग समस्या, मुख्य रस्त्यावर वर्षानुवर्षे उभी असलेली बेवारस वाहने, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, बाजार पेठेतील व्यापारी वर्गाचे दुकानांसमोरील अतिक्रमण यासारख्या अनेक बाबींनी सर्वसामान्य वाईकर पुरते हैराण झाले असताना अधिकारी विरुद्ध कारभारी यांच्या अंतर्गत-कुरघोडीच्या राजकारणाने शहराच्या विकासाची गाडी धिम्या गतीने धावत असल्याची खंत वाईकर जनतेतून व्यक्त केली जात आहे.
अतिक्रमण हटावाची थांबलेली मोहीम पाहता मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेवेळीच नगरपालिकेतील दोन्ही आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अधिकारी हटाव उघडलेल्या मोहिमेने वाईकर जनता बुचकळ्यात पडली होती. या मोहिमेचा शेवट अजून पूर्णत्वास गेला नसला तरी सुरू असलेल्या धुसफुसित अधिकारी पुन्हा बाजी मारणार का पदाधिकारी मारणार? हे अजून कोणालाच समजत नसल्याने शहरातील समस्या सुटणार का?
काही दिवसांपूर्वी वाई नगरपालिकेत पदाधिकारी विरुद्ध अधिकारी वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे चित्र सर्व वाईकरांना पहायला मिळाले होते. विरोधक व सत्ताधारी गटाने एकमेकांच्या सुरात सूर मिसळून उघडलेली अधिकारी हटाव मोहीम काहिशी थंडावली असली तरी आजही धुसपुस सुरूच आहे. कोण चांगलं कोण वाईट? हा प्रश्न सर्व वाईकरांना पडला आहे. अजूनही खर खोट्या शंकांचे खर निवारण होत नसल्याने वाई शहरातील सुज्ञ असंख्य नागरिकांतून खासगीत नाराजी व्यक्त केली जात आहे.
दक्षिण काशी वाई नगरपालिकेत वाई तिर्थक्षेत्राचे जनकल्याण करणाऱ्या दोन आघाड्या कार्यरत असून नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे तिर्थक्षेत्रातील “जनते’च्या कल्याणकारी योजनेत निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्वजण आघाड्यातील मतभेद विसरून सर्वच पदाधिकारी प्रथमच शहराच्या विकासासाठी एकवटल्याचे पाहून काही काळ सर्व वाईकर खूश झाले खरे पण एकाचवेळी दोन्ही बाजूने उघडलेली मोहीम पुन्हा थंडीने काकडल्याची भावना जनतेच्या मनात घर करू लागली आहे. यापूर्वीही बिलावर सही करण्याच्या वादातून नगराध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी अशी वाईकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेली सुंदोपसुंदी नंतर काही दिवस अलबेल झाली होती ती पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरू असून आता नव्याने सुरू झालेल्या अधिकारी विरुद्ध पदाधिकारी यांच्यामधील वाद नक्की कशासाठी याचे कोडे वाईकर जनतेला उलगडत नाही. नगरपालिकेत सुरू असलेली ही धुसफुस निकाली होत नसल्यामुळे वाईचा विकास ठप्प होऊ लागल्याने शहरातील सर्व सामान्य नागरिकांना चिंता लागून राहिली आहे.
तिर्थक्षेत्राच्या जनकल्याणासाठी सुरू असलेल्या गटबाजीत कोण बरोबर कोण चूक याचे उत्तर वाईकर जनता शोधत असून वाई शहराच्या विकासासाठीच नेमलेले व निवडलेले एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिल्याने जनतेच्या मनात अनेक प्रश्नांची चलबिचल सुरू होऊन उलटसुलट चर्चेमुळे वाई शहरातील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. अधिकारी विरुद्ध पदाधिकारी सुरू असलेल्या वादाच्या दंगलीतील खरी ग्यानबाची मेक अजूनतरी वाईकर नागरिकांना समजली नाही तरी अधिकारी आणि पदाधिकारी सर्वसामान्य वाईकरांचे कल्याणकारी हित जोपासण्यासाठीच हक्काची लढाई खेळत असल्याची धारणा तमाम वाई शहरवासियांची असून अनेकवर्ष अडचणी व समस्याच्या गर्तेत सापडलेल्या वाई शहरासह तिर्थक्षेत्राचे जनकल्याण व्हावे हीच भावना वाईकर जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.