सोलापूर – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार आहे, असे प्रकाश आबंडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभा निवडणुकीत कुणासोबतही जाणार नाही. विधानसभेत सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ते सर्व अपयशी ठरले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांचा तोल सुटला असावा. त्यामुळेच त्यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केली. वैयक्तिक टीका करणे म्हणजे निवडणूक नरेंद्र मोदींच्या हातातून निसटत चालल्याचे निदर्शक आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देणार नसल्याची भूमिकाही प्रकाश आबंडेकर यांनी स्पष्ट केली. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपेक्षा बसपा प्रमुख मायावतींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ, असेही त्यांनी सांगितले.