कराड -कराड तालुक्यातील गावांना टोलमुक्ती द्यावी, या मागणीसाठी वर्षभरापासून पाठपुरावा करत आहे. मात्र शासन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे. हा लढा भविष्यात तीव्र करणार असल्याचा इशारा युवा नेते विश्वजीत पाटील यांनी दिला आहे.
कराड तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेला आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर महामार्गाचा वापर करावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महामार्गाचा उपयोग करावा लागतो. कराड, मलकापूर, उंब्रज या सारख्या मोठ्या बाजारपेठा या महामार्गावर आहेत. त्यामुळे कराड तालुक्यातील लोकांना दैनंदिन कामासाठी ये-जा करताना महामार्गाचा उपयोग करावा लागतो. दहा, वीस किलोमीटरसाठी 90 रुपये टोल द्यावा लागतो.
महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल किंवा पनवेल महानगर पालिका या ठिकाणी राज्य शासनाने चार चाकी वाहनांसाठी टोल माफ केला आहे. तासवडे टोल नाक्याची सर्व रक्कम वसूल झाली असली तरीही टोल वसुली सुरू आहे. टोल नाक्यावर चार वसुली बुथ हे अनधिकृत चालवले जातात. त्यास शासनाकडून कोणतीच मान्यता नाही. मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे.