विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
नवी दिल्ली – विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर देखील दिल्ली संघात मला स्थान मिळाले नव्हते, अशी आठवण सांगताना विराट कोहली भावुक बनला होता. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो व त्या रात्री खूप वेळ रडत होतो असेही त्याने सांगितले.
जेव्हापासून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली तेव्हा दिल्लीच्या संघात स्थान मिळवायचे हेच माझे पहिले उद्दिष्ट होते. त्यासाठी ज्या सामन्यांत किंवा स्पर्धेत मला संधी मिळाली त्यात प्रत्येकवेळी अव्वल खेळ व्हावा यासाठी खूप मेहनत घेत होतो. मात्र, 2005-06 च्या मोसमात दिल्ली रणजी संघात मला स्थान मिळेल अशी मला खात्री होती, पण जेव्हा संघ निवड झाली व मला त्यात स्थान नसल्याचे समजले तेव्हा खूप वाइट वाटले होते. मी खूप निराशही झालो होतो. मात्र, त्याच वर्षी मला विविध स्पर्धांतील कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळाले व त्यानंतर माझी खरी वाटचाल सुरु झाली.
कोहलीने सोशल मीडियावर जेव्हा या भावना व्यक्त केल्या त्यावेळी देखील या आठवणींना उजाळा देताना त्याच्या डोळ्यात पाणी तरारले होते. त्याची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने त्याला सावरले. हा व्हिडीओ पाहून कोहलीच्या चाहत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत असे पोस्ट करत कोहलीच्या भावनांना सलाम केला.
पोलीस, डॉक्टर व नर्स हेच खरे हिरो
करोनाचा धोका कायम असला तरीही त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देशवासियांसाठी सातत्याने कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर व नर्स यांच्यासह सर्व कर्मचारी हेच खरे देशाचे हिरो आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत कोहलीने या सर्वांना सलाम केला आहे.