वडगाव मावळ – कान्हे (ता. मावळ) येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या खापरे ओढ्याजवळील स्मशानभूमीकडे जा-येण्यासाठी सेवा रस्ता तसेच आंबेवाडी (कान्हे) येथील इंद्रायणी नदीजवळील स्मशानभूमीकडे ये-जा करण्यासाठी रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या स्मशानभूमीकडे अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी करण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. या महामार्गावरून 24 तास अवजड व अन्य वाहतूक सुरू असते.पावसाळ्यात साईट पट्ट्या खचल्याने तिरडी घेऊन खांदेकऱ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. महामार्गावर सुसाट वाहने ये-जा करत असल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या महिला आणि पुरुषांचे पायघसरून पडल्याने ते किरकोळ व गंभीर जखमी होतात. सेवा रस्ता नसल्याने वाहने महामार्गालगत उभी केल्याने वाहतूक कोंडी होते.
दशक्रिया विधीसाठी पायी चालत जाणाऱ्यांना धडकीच बसते. त्यातच आंबेवाडी (कान्हे) येथील इंद्रायणी नदीजवळील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तिरडी घेऊन चालण्यासाठी खांदेकरी पुढे येत नाही. स्मशानभूमीकडे जाण्याची येण्यासाठी सेवा रस्ता करण्याची मागणी तुषार सातकर, विशाल सातकर, ऋषिकेश सातकर, सचिन सातकर व ग्रामस्थांनीकेली आहे. आंबेवाडी (कान्हे) येथील इंद्रायणी नदीजवळील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक, पाहुणे मंडळींना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.